

मुंबई : ”यंदा ५० पेटी काढलंय…लाखभर रुपये तरी होऊक व्हये”, हापूस आंब्याविषयीचं हे बोलणं एखाद्याला बुचकाळ्यात पाडू शकतं. नवखा माणूस कोकणात आला, की त्याला आंबा आणि त्याच्या धंद्याविषयी अप्रुप वाटतं. वर्षातून एकदा येणारं फळं इतकं उत्पन्न मिळवून देऊ शकतं, ही कल्पनाच भन्नाट आहे. मात्र त्यामागे असणारी मेहनत, काबाडकष्ट याची लेखाजोगा कुठेही लिहून ठेवला जात नाही. पोटच्या पोराप्रमाणं प्रत्येक झाडाची काळजी घेणं, त्याचं आयुष्य अजून वाढवणं, हे प्रत्येक बागायतदाराचं प्राथमिक कर्तव्य असतं. देवगड, रत्नागिरी हापूस आणि त्याची हंगामात असणारी किंमत हे तुम्हाला सर्वांनाच ठाऊक असेल. जसजसा हंगाम संपत जातो तसतसा आंब्याचा भाव उतरत जातो. पण जानेवारी, फेब्रुवारीमध्ये एखादी पेटी विकत घेणं, हे सामान्य माणसांना परवडणारं नसतं, कारण ही पेटी दहा हजारच्या पटीत गणली जाते. त्यामुळे एखाद्या फळावर इतका खर्च सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री लावू शकतो.
एका झाडाला किती पेट्या येतात?
१० ते १२ बागा असणारा बागायतदार सावकार किंवा कोकणी भाषेत शेठ म्हणून ओळखला जातो. त्याचा धंदा हा मोठाच असतो. पण मोजकी झाडं गाठीशी असणारा बागायतदारही चांगले पैसे मिळवू शकतो. एक यशस्वी आंबा बागायतदार एका हापूसच्या झाडापासून एक लाख रुपये कमावू शकतो, हे ऐकल्यावर तुम्ही आश्चर्यचकित व्हाल. पण हे खरं आहे आणि यात नवल वाटण्याचं विशेष कारण नाही. एखाद्या हापूस झाडाची लागवण केल्यानंतर ते झाड जवळपास तीन वर्षांनंतर उत्पादन द्यायला सुरुवात करतं. तीन महिन्यांच्या झाडाकडून आपल्याला ४-५ डझन आंबे मिळू शकतात. साधारण २०-२५ वर्ष वय झाल्यानंतर हेच झाड चांगलं जोपासलं तर ५०-६० पेटी आंबा मिळवून देऊ शकतं. याचा अर्थ असा नाही, की फक्त झाड लावलं आणि त्याला आंबे आले. जशी काळजी आपण आपल्या शरिराची घेतो, तसंच काहीसं प्रत्येक आंबा बागायतदार आपल्या झाडांची घेतो.
आंब्याचे दर हे वर्षाच्या सुरुवातीला उच्च आणि पाचव्या महिन्यात तीन आकडी किमतीवर येऊन थांबतात. उदाहरण द्यायचं झालं, तर जानेवारी ते फेब्रुवारीदरम्यान हापूस आणि व्यावसायिक आंब्याचा दर प्रत्येक पेटीमागे चार हजारांपर्यंत असतो. त्यानंतर तो हळूहळू मे महिन्यापर्यंत एक हजार रुपयांपर्यंत उतरतो. कधीकधी हा दर ३००, ४००, ५०० रुपयांपर्यंतही खाली येतो. ५० पेटी उत्पादन देणार झाडं एकाच वेळी काढलं जात नाही. जसजसा आंबा परिपक्व होतो, त्यानुसार तो तोडला जातो. तरी प्रत्येकी एका झाडामागे चार ते पाच वेळा आंबा-तोडणी केली जाते. त्यानुसार एकाच वेळी प्रत्येक पेटीला चढे-भाव मिळत नाहीत. सरासरी दोन हजार रुपये असा दर प्रत्येक पेटीला मिळतो.
एक झाडं-एक लाख कसं?
५० पेट्यांचे प्रत्येकी दोन हजार रुपयांप्रमाणे धरल्यास एका झाडाचे एक लाख रुपये होऊ शकतात. शिवाय, बाजारात पाठवण्यालायक नसलेला आंबा कॅनिंगमार्फत किलोपद्धतीनं विकला जातो. हा आंबा लोणचं, आंबारस, पन्हं करण्यासाठी उपयोगात आणला जातो. त्यामुळं चांगल्या पद्धतीनं झाडाची निगा राखल्यास, त्याला वेळेवर औषध फवारणी, खत-पाणी दिल्यास हेच झाड तुम्हाला लखपती बनवू शकतं.