

मुंबई : मध्य प्रदेशातील धार जिल्ह्यातील इंदूर-खरगोन दरम्यान सोमवारी सकाळी मोठा अपघात (MP Bus Accident) झाला. इंदूरहून पुण्याला जाणारी बस सकाळी १०.४५ वाजता धामनोद येथील खलघाटाजवळ नर्मदा नदीत पडली. बसमध्ये महिला आणि लहान मुलांसह ४० प्रवासी होते. आतापर्यंत १३ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
खालघाट येथील दुपदरी पुलावर एका वाहनाला ओव्हरटेक करताना बसचं नियंत्रण सुटलं, असं सांगण्यात आलं. चालकाचा नियंत्रण सुटलं आणि बस रेलिंग तोडून नदीत पडली. अपघाताची माहिती मिळताच खालघाटासह आजूबाजूचे लोक घटनास्थळी दाखल झाले. इंदूर आणि धार येथील एनडीआरएफचे पथक घटनास्थळी पोहोचले आहे. हा पूल जुना असल्याचं सांगितलं जाते. बस महाराष्ट्र राज्य परिवहनाची आहे. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी प्रशासनाला बचाव आणि मदत कार्याचे आदेश दिले आहेत.
Passenger bus going from Indore to Maharashtra fell down due to loss of balance from Khalghat Sanjay Setu bridge#Accident #KhalghatSanjaySetuBridge #BusAccident pic.twitter.com/oMC7xVNgUz
— Himanshu dixit (@HimanshuDixitt) July 18, 2022
आग्रा-मुंबई (एबी रोड) महामार्गावर हा अपघात झाला. हा रस्ता इंदूरला महाराष्ट्राला जोडतो. घटनास्थळ इंदूरपासून ८० किलोमीटर अंतरावर आहे. संजय सेतू पूल ज्यावरून बस पडली तो धार आणि खरगोन या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर बांधलेला आहे. पुलाचा अर्धा भाग खलघाट (धार) आणि अर्धा खलटाका (खरगोन) येथे आहे. खरगोनचे जिल्हाधिकारी आणि एसपीही घटनास्थळी पोहोचले. जखमींना जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. क्रेनच्या सहाय्यानं बस बाहेर काढण्यात आली.
नदीत पडलेली बस महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची आहे. ही एसटी सकाळी पुण्याहून इंदूरला निघाली होती. खलघाटात अपघात होण्यापूर्वी बसनं १० मिनिटांचा ब्रेक घेतला, त्यानंतर बस खलघाटातून निघून सकाळी १०:४५ वाजता नर्मदेत पडली.