‘‘अस्सलाम वालेकुम”, उद्धव ठाकरेंना फोन करून राजनाथ सिंहांनी डिवचलं?

WhatsApp Group

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी मातोश्री निवासस्थानी माजी आमदारांच्या बैठकीत मोठा खुलासा केला. उद्धव ठाकरे आणि संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यातील कथित फोन संभाषणाची चर्चा होतेय. उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या नेत्यांना सांगितलं, ”नुकतंच संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी फोन केला होता. त्यांनी ‘अस्सलाम वालेकुम’ नं संभाषणाची सुरुवात केली. मी यावर आक्षेप घेतला तेव्हा त्यांनी ‘जय श्री राम’ म्हटलं.”

महाराष्ट्रातील सत्तापलट आणि पक्षातील बंडखोरीमुळं शिवसेना अडचणीत आली आहे. अशा स्थितीत उद्धव गटाचे एनडीए आणि भाजपशी संबंध असल्याबाबत पुन्हा एकदा सट्टेबाजीचा बाजार तापला आहे. याला निमित्तही राष्ट्रपतीपदाची निवडणूक आहे. या निवडणुकीनंतरच महाराष्ट्रात नवीन मंत्रिमंडळ स्थापन होईल, असं समजलं जात आहे.

काय घडलं?

राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसंदर्भात शिवसेनेनं सोमवारी आणि मंगळवारी पक्षाच्या खासदार आणि आमदारांची बैठक बोलावली होती. मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे, की यामध्ये उद्धव ठाकरे यांनी त्यांच्या सहकारी नेत्यांना राजनाथ सिंह यांनी फोन करून मुर्मू यांना पाठिंबा मागितल्याचं सांगितलं. राजनाथ सिंह यांनी ‘अस्सलाम वालेकुम’ असं म्हणत संवादाला सुरुवात केली, असे उद्धव ठाकरे म्हणाले. यावर संरक्षणमंत्र्यांनी लगेच ‘जय श्री राम’ म्हटले आणि त्यानंतर दोघांमध्ये पुढील चर्चा झाली.

काय म्हणाले ठाकरे?

राजनाथ सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याकडून अशी भाषा वापरण्यात आल्याचं पाहून मला आश्‍चर्य वाटलं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबतच्या महाविकास आघाडीच्या स्थापनेचा खरपूस समाचार घेताना राजनाथ सिंह यांनी असं म्हटलं असावं, असं मानलं जात आहे. उद्धव ठाकरे यांनी २०१९ मध्ये राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत सरकार स्थापन केलं, जे एकनाथ शिंदे गटाच्या बंडखोरीपर्यंत अडीच वर्षे टिकलं. शिवसेनेवर हे सरकार स्थापन झाल्यापासून हिंदुत्वाशी तडजोड केल्याचा आरोप होतोय. भाजपकडूनही असा हल्लाबोल करण्यात आला आहे.

मात्र, उद्धव ठाकरे यांनी हिंदुत्वाशी तडजोड न करण्याबाबत अनेकदा बोलले आहे. गेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीतही त्यांनी हा संदेश देण्याचा प्रयत्न केला आणि औरंगाबाद जिल्ह्याचं नामांतर संभाजी नगर करण्याचा ठराव मंजूर केला. माध्यमांच्या वृत्तानुसार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ३० ते ३५ आमदारांच्या उपस्थितीत ही घटना सांगितली. एनडीएकडून राष्ट्रपती निवडणुकीच्या समन्वयाची जबाबदारी राजनाथ सिंह यांच्याकडं देण्यात आलीय. देशभरातील विविध पक्षांच्या नेत्यांशी ते बोलत आहेत आणि विशेषत: समविचारी पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

Leave a comment