

मुंबई : २९ जुलैपासून श्रावण (Shravan 2022) महिना सुरू होत असून तो २७ ऑगस्टपर्यंत चालणार आहे. श्रावण महिना हा भगवान शिवाच्या पूजेसाठी सर्वोच्च मानला जातो आणि या महिन्यात बहुतेक लोक मांसाहारापासून दूर राहतात. घरातील वडीलधारी मंडळी कुठलाही युक्तिवाद न करता धर्माच्या आधारे श्रावणात मांसाहार न करण्याचा सल्ला देतात आणि आपणही ते आंधळेपणाने पाळतो. पण, तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की या परंपरेमागे धार्मिक तसेच वैज्ञानिक कारणं आहेत. श्रावण महिन्यात मांसाहार का करू नये आणि ते खाल्ल्याने तुमच्या आरोग्यावर काय परिणाम होतो?
पावसाळ्यात आपली पचनशक्ती कमकुवत होते. श्रावण महिन्यात पाऊस पडत असल्यानं हवामानात आर्द्रता राहते, त्यामुळे आपल्या पचनक्रियेवरही परिणाम होतो आणि ती कमकुवत होते. शाकाहारीपेक्षा मांसाहार पचायला जास्त वेळ लागतो आणि पचनशक्ती कमकुवत झाल्यामुळं मांसाहार आतड्यांमध्ये सडायला लागतो आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो.
श्रावण महिन्यात देशभरात मुसळधार पाऊस पडतो आणि त्यामुळे वातावरणात बुरशीजन्य संसर्ग वाढू लागतो. पावसाळ्यात अन्नपदार्थ लवकर खराब होऊ लागतात आणि त्याचा सर्वात मोठा परिणाम मांसाहारावर होतो. सूर्यप्रकाशाची कमतरता आणि आर्द्रता खूप जास्त आहे, त्यामुळं अन्नपदार्थ लवकर संक्रमित होतात.
हेही वाचा – कधीपासून सुरू होणार 5G? किंमत किती असणार? रिचार्जचा खर्च वाढणार का?
पावसाळ्यात कीटक-जंतूंचं प्रमाण वाढतं, त्यामुळे अनेक आजार होतात. प्राणी अनेकदा तृणधान्य खातात आणि पावसाळ्यात ते अनेक प्रकारचे कीटक देखील खातात, ज्यामुळे ते आजारी पडतात आणि मांसाहारी अन्न खाल्ल्यानं संसर्ग मनुष्यापर्यंत पोहोचू शकतो.
पावसाळ्यात मासे अंडी घालतात: पावसाळ्यात म्हणजे श्रावणामध्ये सीफूड खाणंदेखील हानिकारक असू शकते, कारण यावेळी मासे अंडी घालतात आणि त्यामुळं त्यांच्या शरीरात अनेक हार्मोनल बदल होतात. यावेळी सीफूड खाणं योग्य नसतं, कारण त्याचा आपल्या आरोग्यावरही परिणाम होतो.
उशिरा पचणारं अन्न पावसाळ्यात खाऊ नये, कारण पोटात अन्न लवकर पचलं नाही तर ते आतड्यांमध्ये सडायला लागते आणि त्याचा आरोग्यावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे या ऋतूत लवकर पचणारं अन्न माणसाच्या पोटात गेलं पाहिजे. वरील सर्व कारणांमुळं श्रावणात मांसाहार टाळला जातो.
धार्मिक कारण
हिंदू धर्मानुसार, या महिन्यातील प्रत्येक दिवस देवाला समर्पित आहे आणि भक्तांमध्ये त्याचं महत्त्व आहे. यामुळे हा संपूर्ण महिना शुभ मानला जातो. उदाहरणार्थ, सोमवारी भगवान शिवाची पूजा केली जाते, मंगळवारी मंगला गौरीची पूजा केली जाते आणि बुधवारी बुद्धाची पूजा केली जाते. गुरुवार बृहस्पती पूजेसाठी, शुक्रवार जरा जीविका पूजेसाठी आणि शनिवार अश्वथ मारुती पूजेसाठी ठेवण्यात आला आहे. याशिवाय तीज, कृष्ण जन्माष्टमी, रक्षाबंधन आणि नागपंचमी असे अनेक प्रमुख हिंदू सण श्रावणामध्ये येतात.