‘त्या’ वादग्रस्त विधानावर राज्यपाल कोश्यारींचं स्पष्टीकरण; म्हणाले, “महाराष्ट्राला पुढं नेण्यात…”

WhatsApp Group

मुंबई : महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या ‘मुंबई’ शहरावरील विधानावरून गदारोळ उडाला. या विधानाच्या राजकीय निषेधाच्या पार्श्वभूमीवर राज्यपालांनी स्पष्टीकरण दिलं आहे. कोश्यारी यांनी अंधेरी येथे केलेल्या भाषणावर स्पष्टीकरण देताना म्हणाले, ”महाराष्ट्राला पुढे नेण्यात मराठी लोकांचे योगदान सर्वाधिक आहे. मुंबई ही महाराष्ट्राची शान आहे. ती देशाची आर्थिक राजधानीही आहे. मराठी लोकांना कमी लेखण्याचा माझा कोणताही हेतू नव्हता. मी फक्त गुजराती आणि राजस्थानींच्या योगदानाबद्दल बोललो. मराठी माणसांनी कष्ट करून महाराष्ट्र उभा केला, म्हणूनच आज अनेक मराठी उद्योजक प्रसिद्ध आहेत.” काल शुक्रवारी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी एका कार्यक्रमात एक वक्तव्य केलं होतं त्यावरून महाराष्ट्राच्या राजकारणात नवा वाद निर्माण झाला.

कोश्यारींच्या वक्तव्याचा निषेध

राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानाला उत्तर देताना काँग्रेस नेते मिलिंद देवरा म्हणाले, “माझे वडील राजस्थानचे होते आणि माझी आई कोल्हापूरची होती. तरीही ते मुंबईकर आणि महाराष्ट्रीयन म्हणून पहिले आले. मुंबईतील रहिवाशांनी सर्वांचं प्रेम आणि आदरानं स्वागत केलं आहे.” त्याचवेळी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनीही ”मराठी माणसाला डिवचू नका”, असं सांगितलं होतं. ”गुजराती आणि राजस्थानींना मुंबईतून हटवलं, तर या शहराला ना पैसा असेल ना आर्थिक राजधानीची पदवी”, असं कोश्यारींनी म्हटलं होतं.

हेही वाचा – धक्कादायक..! महिलेला ७० सेकंदात २८ शिव्या; सोशल मीडियावर संजय राऊतांची ऑडिओ टेप?

काँग्रेसनं राज्यपालांच्या या वक्तव्याचा निषेध केला असून त्यांनी माफी मागावी अशी मागणी केली आहे. मुंबईच्या पश्चिम उपनगरातील अंधेरी येथील चौकाच्या नामकरण समारंभाला संबोधित करताना कोश्यारींनी हे वक्तव्य केलं. राजभवनानं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं, आहे की कोश्यारी यांनी मुंबईला देशाची आर्थिक राजधानी बनवण्यात राजस्थानी मारवाडी आणि गुजराती समुदायाच्या योगदानाचं कौतुक केलं आहे. राज्यपाल म्हणाले, ”राजस्थानी मारवाडी समाज देशाच्या विविध भागात तसेच नेपाळ आणि मॉरिशससारख्या देशांमध्ये वास्तव्यास आहे. या समाजाचे लोक जिथे जातात तिथे ते केवळ व्यवसायच करत नाहीत तर शाळा, रुग्णालये बांधण्यासारखी धर्मादाय कामंही करतात.”

संजय राऊत काय म्हणाले?

राज्यपाल कोश्यारी यांचं भाषण ट्विटरवर शेअर करताना संजय राऊत म्हणाले, “राज्यपालांचं म्हणणं म्हणजे महाराष्ट्र आणि मराठी माणूस म्हणजे भिकारी. मुख्यमंत्री शिंदे, ऐकताय का? , जर तुम्हाला स्वाभिमान असेल तर राज्यपालांचा राजीनामा मागा.”

Leave a comment