

Asia cup 2022 : आशिया कप २७ ऑगस्टपासून सुरू होत आहे. या स्पर्धेत श्रीलंका आणि अफगाणिस्तान सलामीच्या लढतीत भिडतील. दुसऱ्या दिवशी म्हणजेच २८ ऑगस्टला भारत आणि पाकिस्तान (IND vs PAK) दुबईत आमनेसामने असणार आहेत. दोन्ही देशांचे क्रिकेट चाहते या सामन्याची आतुरतेनं वाट पाहत आहेत. १५ ऑगस्टपासून तिकीटांची विक्री सुरू होणार आहे. आशियाई क्रिकेट परिषदेनं (ACC) ट्वीट करून ही माहिती दिली. ACC नं सांगितलं, की आशिया कप २०२२ च्या तिकिटांची विक्री १५ ऑगस्टपासून सुरू होईल. यासोबतच ACC नं ऑनलाइन प्लॅटफॉर्मची माहितीही शेअर केली आहे, ज्याद्वारे चाहते आशिया कपसाठी तिकिटं खरेदी करू शकतात. तुम्ही भारत-पाकिस्तान सामन्याची तिकिटं आशिया कपच्या अधिकृत वेबसाइट आणि त्याच्या भागीदार कंपन्यांच्या साइटवरून खरेदी करू शकता.
भारत, पाकिस्तान, श्रीलंका, अफगाणिस्तान आणि बांगलादेश यासह प्रमुख क्रिकेट देश या स्पर्धेसाठी आधीच पात्र ठरले आहेत तर पात्रता सामने ओमानमध्ये यूएई, कुवेत, सिंगापूर आणि हाँगकाँग यांच्यात खेळले जाणार आहेत. त्याचा पहिला सामना २० ऑगस्ट रोजी हाँगकाँग आणि सिंगापूर यांच्यात होणार आहे.
हेही वाचा – “दोन वर्षांनी इन्स्टाग्राम उघडलं, डीपी बदलला आणि…” देशप्रेमी महेंद्रसिंह धोनीनं जिंकली मनं!
Tickets🎟for Asia Cup 🏆2022 go up for sale on August 15th 🗓 Visit the link below from Monday onwards to book your tickets:https://t.co/BjfeZVCIxi pic.twitter.com/Q8y9mwj6Z5
— AsianCricketCouncil (@ACCMedia1) August 13, 2022
आधी श्रीलंका आणि यूएईत स्पर्धा
आशिया कप स्पर्धेबद्दल बोलायचं झालं तर, ही स्पर्धा यावर्षी श्रीलंकेत खेळवली जाणार होती, परंतु तेथील राजकीय आणि आर्थिक अस्थिरतेमुळं आयोजन समितीनं ही स्पर्धा यूएईमध्ये हलवण्याचा निर्णय घेतला. याबाबत, ACC नं एका निवेदनात म्हटलं आहे, की श्रीलंकेतील सध्याची परिस्थिती पाहता, ACC नं विस्तृत विचारविमर्शानंतर सर्वानुमतं असा निष्कर्ष काढला आहे की ही स्पर्धा श्रीलंकेतून यूएईला हलवणं योग्य ठरेल.
भारतीय संघ झिम्बाब्वे दौऱ्यावर
आशिया कपपूर्वी भारतीय संघ १८ ऑगस्टपासून झिम्बाब्वेविरुद्ध तीन वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. मात्र, रोहित शर्मा, विराट कोहली, ऋषभ पंत यासारखे खेळाडू या मालिकेत खेळत नाहीत. या दौऱ्यातून केएल राहुल भारतीय संघात पुनरागमन करत आहे. झिम्बाब्वेविरुद्धच्या वनडे मालिकेसाठी त्याची कर्णधारपदी निवड करण्यात आली आहे. त्याच्याशिवाय दीपक चहरही सहा महिन्यांनी संघात परतणार आहे.
हेही वाचा – ‘दादा’गिरीला पुन्हा सुरुवात..! सौरव गांगुली क्रिकेटच्या मैदानात; करणार भारतीय संघाचं नेतृत्व!
टीम इंडिया सात वेळा आशिया कप चॅम्पियन
आशिया कपच्या इतिहासात भारत हा सर्वात यशस्वी संघ आहे. टीम इंडियाने सात वेळा विजेतेपद पटकावलं आहे, तर श्रीलंकेचा संघ पाच वेळा विजेतेपद पटकावण्यात यशस्वी ठरला आहे. पाकिस्ताननं दोनदा आशिया कप जिंकला आहे. मात्र, भारत-पाकिस्तान संघांमध्ये कधीही अंतिम सामना खेळला गेला नाही. भारतानं चार वर्षांपूर्वी बांगलादेशला हरवून आशिया कप जिंकला होता.