

मुंबई : एजबॅस्टन येथे खेळल्या जात असलेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये ऑस्ट्रेलियाची क्रिकेटर एलिसा हिलीनं इतिहास रचला. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या या सामन्यात कांगारू संघाची अनुभवी यष्टीरक्षक एलिसा हिलीनं विकेटच्या मागे १०० बळी घेतले. टी-२० क्रिकेटच्या इतिहासात अशी कामगिरी करणारी ती जगातील पहिली क्रिकेटपटू ठरली. या रेकॉर्डमध्ये तिनं भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनीला मागं टाकलं आहे.
हिलीचा रेकॉर्ड!
एलिसा हिलीनं भारताविरुद्धच्या कॉमनवेल्थ गेम्सच्या पहिल्या सामन्यात १०० बळी पूर्ण केले. टीम इंडियाचा माजी कर्णधार एमएस धोनीनं टी-२० क्रिकेटमध्ये यष्टीपाठी ९१ बळी घेतले आहेत. यात झेल आणि स्टम्पिंगचा समावेश आहे. भारतीय डावाच्या चौथ्या षटकात हिलीनं स्मृती मानधनाचा झेल घेतला. अशाप्रकारे, पुरुष किंवा महिला क्रिकेटमध्ये १०० बळी घेणारी ती पहिली यष्टीरक्षक बनली आहे. ३२ वर्षीय हिली तिच्या कारकिर्दीतील १२८वा टी-२० आंतरराष्ट्रीय सामना खेळत आहे. या सामन्यात तिनं शफाली वर्माचा झेलही टिपला. तिनं आतापर्यंत ४७ झेल आणि ५४ स्टम्पिंग केली आहेत. अशाप्रकारे तिचे एकूण १०१ बळी झाले आहेत.
Alyssa Healy becomes the first man or woman to claim 100 dismissals in T20 international cricket!
Legend #BoldInGold pic.twitter.com/gnnIgv5QOu
— Australian Women's Cricket Team 🏏 (@AusWomenCricket) July 29, 2022
हेही वाचा – IND Vs WI : रोहित शर्मा अॅक्शन मोडमध्ये..! नेट्समध्ये खेळला हेलिकॉप्टर शॉट; पाहा VIDEO
भारताचं ऑस्ट्रेलियाला १५५ धावांचं आव्हान!
भारतानं ऑस्ट्रेलियाला विजयासाठी १५५ धावांचं लक्ष्य दिलं. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघानं आठ गडी गमावून १५४ धावा केल्या. ५२ धावांची शानदार खेळी खेळून हरमनप्रीत बाद झाली. तो मेगन शटच्या गोलंदाजीवर बाद झाली. भारताची सलामीवीर शफाली वर्मानं ४८ धावांची तर स्मृती मंधानानं २४ धावांची खेळी केली. ऑस्ट्रेलियाकडून जेस जोनासननं २२ धावांत चार बळी घेतले. प्रत्युत्तरात ऑस्ट्रेलियाची दयनीय सुरुवात झाली. त्यांनी ४९ धावांत ५ बळी घेतलेय भारताची वेगवान गोलंदाज रेणुका सिंगनं १८ धावांत ४ बळी घेत ऑस्ट्रेलियाच्या डावाला सुरुंग लावला. धोनीचा रेकॉर्ड मोडणारी हिलीला खातंही खोलता आलं नाही. कांगारू संघ राष्ट्रकुलमध्ये पदकांचा प्रबळ दावेदार मानला जात असून भारताला पदक जिंकण्याचं स्वप्न साकार करायचं असेल, तर ऑस्ट्रेलियाचं आव्हान कोणत्याही किंमतीवर पार करावं लागेल.
टी-२० क्रिकेटमध्ये सर्वाधिक विकेट घेणारे यष्टीरक्षक
- १०१ – एलिसा हिली
- ९१ – महेंद्रसिंह धोनी
- ७४ – सारा टेलर
- ७३ – क्विंटन डी कॉक
- ७२ – राचेल प्रिस्ट
कॉमनवेल्थ गेम्समध्ये एकूण आठ संघांचा समावेश करण्यात आला आहे. ते दोन गटांमध्ये विभागले गेले आहेत. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत जातील. भारताच्या गटातील आणखी दोन संघ पाकिस्तान आणि बार्बाडोस आहेत.