कॉमनवेल्थ गेम्स नका खेळू..! भारतातून का होतो विरोध? काय सांगतो स्पर्धेचा इतिहास?

WhatsApp Group

मुंबई : कॉमनवेल्थ गेम्स २०२२ (Commonwealth Games 2022) आजपासून (२८ जुलै) इंग्लंडमधील बर्मिंगहॅममध्ये सुरू होत आहेत. आज उद्घाटन सोहळा होणार आहे, ज्यामध्ये भारतीय खेळाडूंचा संघही सहभागी झाला आहे. यामध्ये दोन वेळा ऑलिम्पिक चॅम्पियन पीव्ही सिंधूसह हॉकी संघाचा कर्णधार मनप्रीत सिंगला ध्वजवाहक बनवण्यात आले आहे. यावेळी प्रत्येक देशातून एक महिला आणि एका पुरुष खेळाडूला ध्वजवाहक म्हणून संधी मिळणार आहे. सिंधूनंतर दुसरा भारतीय ध्वजवाहक म्हणून मनप्रीतची निवड होण्यामागचे हेच कारण आहे. यावेळी कॉमनवेल्थ गेम्समध्ये २१३ अधिक भारतीय खेळाडू १६ खेळांत सहभागी होणार आहेत. ८ ऑगस्टला या स्पर्धेचा शेवट होईल.

९२ वर्षांपासून आयोजन

२०व्या शतकाच्या सुरूवातीस, ब्रिटननं जगाच्या ४० टक्के भूप्रदेशावर राज्य केलं. ही गोष्ट साजरी करण्यासाठी १९११ मध्ये ब्रिटीश साम्राज्याचा उत्सव सुरू झाला. या उत्सवाचा एक भाग म्हणून, १९३० मध्ये, हॅमिल्टन कॅनडात प्रथमच, साम्राज्याखालील देशांच्या सहभागासह अनेक खेळ असलेली स्पर्धा सुरू करण्यात आली. याला प्रथम ‘ब्रिटीश एम्पायर गेम्स’ असं म्हटलं गेलं आणि नंतर त्याला ‘कॉमनवेल्थ गेम्स’ असं नाव देण्यात आलं. तेव्हापासून १९४२ आणि १९४६ वगळता दर चार वर्षांनी या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे.

भारतातून कॉमनवेल्थ गेम्सला विरोध!

भारत १९४७ मध्ये स्वतंत्र झाला. भारत आज जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. भारताचा जीडीपी आता यूकेच्या जीडीपीच्या आसपास आहे. अशा परिस्थितीत कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताच्या सहभागाविरोधात देशातील एक मोठा वर्ग आवाज उठवत आहे. हा कार्यक्रम ब्रिटिशांच्या गुलामगिरीचे प्रतीक आहे, त्यामुळं भारतानं त्यात सहभागी होणं थांबवावं, असं त्यांचं म्हणणं आहे. राष्ट्रकुल स्पर्धेला विरोध होण्यामागचं आणखी एक कारण म्हणजे स्पर्धेतील कमी पातळी. कॉमनवेल्थ गेम्सचा दर्जा ऑलिम्पिक आणि आशियाई खेळांपेक्षा कमी आहे. या खेळांमध्ये भाग घेतल्यानं भारतीय खेळाडूंमध्ये सुधारणा होत नाही, असं काही तज्ज्ञांचे मत आहे. कमकुवत खेळाडूंना पराभूत केल्यानंतर ते आत्मसंतुष्ट होतात आणि या आत्मसंतुष्टतेची हवा ऑलिम्पिकमध्ये निघून जाते.

हेही वाचा – VIDEO : मराठी चाहत्यासोबत गप्पा मारताना दिसली छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती; रोहित म्हणाला…

भारताने चार हंगामात (१९३०, १९५०, १९६२ आणि १९८६) वगळता चार वर्षांतून एकदा आयोजित केलेल्या या स्पर्धेत भाग घेतला आहे. १९३४ मध्ये लंडन येथे झालेल्या कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारतानं पदार्पण केलं. लंडन कॉमनवेल्थ गेम्समधील भारतीय संघात सहा खेळाडूंचा समावेश होता, ज्यांनी १० ट्रॅक आणि फील्ड इव्हेंट आणि एका कुस्ती स्पर्धेत भाग घेतला. पहिल्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताला केवळ एकच पदक मिळालं होतं. कुस्तीपटू रशीद अन्वर यांनी पुरुषांच्या ७४ किलो फ्रीस्टाइल कुस्ती स्पर्धेत कांस्यपदक जिंकलं. पुढील २४ वर्षांतील या खेळांमध्ये भारताचं हे एकमेव पदक होतं. १९५८ मध्ये फ्लाइंग शीख म्हणून प्रसिद्ध असलेल्या मिल्खा सिंग यांनी देशासाठी पहिलं सुवर्णपदक जिंकलं.

राष्ट्रकुल स्पर्धेत भारतानं आतापर्यंत एकूण ५०३ पदकं जिंकली आहेत. यापैकी ३५० पदकं त्यांनी गेल्या पाच कॉमनवेल्थ गेम्समध्ये जिंकली होती. गेल्या पाच हंगामात भारताची कामगिरी २०० टक्क्यांहून अधिक वाढली आहे.

Leave a comment