

मुंबई : मर्यादित षटकांच्या मालिकेसाठी टीम इंडिया वेस्ट इंडिज दौऱ्यावर पोहोचली आहे. या दौऱ्याची सुरुवात २२ जुलैपासून तीन एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेनं होणार आहे. नियमित कर्णधार रोहित शर्माला वनडे मालिकेतून विश्रांती देण्यात आली आहे. त्याच्या जागी शिखर धवन वनडे मालिकेत टीम इंडियाची कमान सांभाळणार आहे. यानंतर रोहित पाच टी-२० सामन्यांच्या मालिकेसाठी संघात कमबॅक करेल. दरम्यान, सोशल मीडियावर अनेकदा फनी व्हिडिओ शेअर करणाऱ्या शिखरनं इंस्टाग्रामवर एक मजेशीर व्हिडिओ शेअर केला आहे, हा व्हिडिओ रील स्वरुपात आहे. विशेष म्हणजे टीम इंडियाचा कोच राहुल द्रविडही या रीलचा भाग झाला आहे. एकप्रकारे द्रविडनं रीलच्या दुनियेत पदार्पण केलं आहे.
काय आहे रीलमध्ये?
या व्हिडिओमध्ये नवी टीम इंडिया पूर्ण जोशात दिसत आहे. एअरपोर्टवर करण्यात आलेल्या रीलचं नेतृत्व शिखर धवननं केलं आहे. या व्हिडिओमध्ये टीम कोच राहुल द्रविडची एन्ट्री सर्वात खास असून तोही बाकीच्या खेळाडूंसोबत विमानतळाबाहेर पडताना दिसला. शिखरच्या या व्हिडिओवर दिनेश कार्तिकनंही कमेंट केली आहे. त्यानं लिहिले, असे स्टंट फक्त शिखरच करू शकतो. बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंग देखील हा व्हिडिओ पाहिल्यानंतर स्वत:ला थांबवू शकला नाही आणि त्यानंही या रीलला एक नंबर म्हटलं.
wait for Rahul Dravid😂🤌🏼 pic.twitter.com/4F7HlVTzkl
— Kanav Bali🏏 (@Concussion__Sub) July 19, 2022
Wait.. Rahul Dravid a part of Instagram reel? 🤣 #RahulDravid pic.twitter.com/atTihv6aiu
— CBTF Speed News (@cbtfspeednews) July 19, 2022
राहुल द्रविड हा क्रिकेटमधील दिग्गज खेळाडू मानला जातो. त्याच्या क्रिकेट कारकिर्दीत आणि आता कोच असतानाही तो त्याची संयमी, शांत वृत्ती कधी सोडत नाही. प्रसिद्धी, झगमगाट यापासून स्वत:ला दूर ठेवणारा द्रविड अशा रीलचा भाग होतो, तेव्हा अनेकांना ते भारी वाटतं आहे. अनेकांनी द्रविडच्या रील पदार्पणाला पसंती दर्शवली आहे.
धवनची असणार अग्निपरीक्षा!
धवन अजूनही भारतीय वनडे संघाचा भाग आहे. पण, तो कसोटी आणि टी-२० संघात स्थान मिळवण्याच्या शर्यतीतून बाहेर आहे. या महिन्याच्या सुरुवातीला त्यानं इंग्लंडविरुद्धच्या तीन सामन्यांच्या मालिकेसह भारतीय वनडे संघात पुनरागमन केले, जी भारताने २-१नं जिंकली. मात्र, या मालिकेत धवनची कामगिरी काही खास झाली नव्हती. पहिल्या एकदिवसीय सामन्यात त्यानं नाबाद ३१ धावांची खेळी केली. पण, पुढच्या दोन एकदिवसीय सामन्यांमध्ये त्याची बॅट शांत राहिली आणि तो अनुक्रमे ९ आणि १ धाव करून बाद झाला. अशा परिस्थितीत त्याची नजर वेस्ट इंडिजविरुद्धच्या वनडे मालिकेत पुन्हा फॉर्म मिळविण्यावर असेल. कर्णधार आणि सलामीवीर अशी दुहेरी भूमिका बजावण्याची जबाबदारी त्याच्यावर असेल.