

Virat Kohli On Yo-Yo Test : भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) १ जानेवारी २०२३ रोजी आढावा बैठक घेतली. या बैठकीत टीम इंडियाच्या गेल्या वर्षातील कामगिरी आणि इतर अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाली. बीसीसीआयच्या उच्च पदाधिकाऱ्यांनी संघातील कमकुवतपणा ओळखण्यासाठी आणि भविष्यासाठी योजना आखण्यासाठी मुंबईत कर्णधार रोहित शर्मा आणि प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्याशी चर्चा केली. बीसीसीआयच्या या बैठकीत चर्चा झालेल्या सर्व विषयांपैकी यो-यो टेस्टने सर्वत्र हवा निर्माण केली. बीसीसीआयने निवडीचा मापदंड म्हणून यो-यो टेस्टचा पुन्हा एकदा समावेश केला आहे. भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली प्रसिद्ध यो-यो टेस्ट पहिल्यांदा सुरू झाली.
विराटने फिटनेसचे खूप उच्च मापदंड ठेवले होते जेव्हा तो त्याच्या शिखरावर होता. संघात निवडीसाठी त्यांनी यो-यो टेस्ट अनिवार्य केली. आता पुन्हा एकदा टीम इंडियामध्ये यो-यो टेस्टमध्ये पुनरागमन झाल्यानंतर चाहते सोशल मीडियावर याबद्दल आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. यासोबतच चाहत्यांनी जुना व्हिडिओही शेअर केला आहे, ज्यामध्ये विराट कोहली देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना यो-यो टेस्टचे महत्त्व समजावून सांगत आहे.
हेही वाचा – Business Idea : ५० हजारांची गुंतवणूक, लाखोंचा नफा..! नवीन वर्षात सुरू करा ‘हा’ व्यवसाय
पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबतच्या त्यांच्या हलक्या-फुलक्या संभाषणादरम्यान, विराट कोहलीने भारतीय खेळाडूंसाठी यो-यो टेस्टचे महत्त्व सांगितले. तो म्हणाला, “ही टेस्ट फिटनेसच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाची आहे. जर आपण जागतिक फिटनेस पातळीबद्दल बोललो तर, इतर संघांच्या तुलनेत आमची फिटनेस पातळी अजूनही कमी आहे आणि आम्हाला ती वाढवायची आहे, ही मूलभूत आवश्यकता आहे.”
When Virat Kohli spoke about the importance of fitness and Yo-Yo Test in daily lives.pic.twitter.com/9ZWwrrBzVU
— SUPRVIRAT (@ishant_tweetz) January 1, 2023
कोहलीने पुढे खुलासा केला, की, भारतीय संघात ही टेस्ट देणारा तो पहिलाच आहे. कोहली म्हणाला, “मी टेस्टसाठी पहिला आलो होतो आणि ही अट होती की जर मी नापास झालो तर मी देखील निवडीसाठी उपलब्ध होणार नाही.”
काय आहे यो-यो टेस्ट?
यो-यो टेस्टही एरोबिक फिटनेस टेस्ट आहे, जी सहनशक्तीचे मूल्यांकन करते. यामध्ये २०-२० मीटर अंतरावर ठेवलेल्या मार्करमध्ये वाढत्या वेगाने धावावे लागते. विराट कोहली भारतीय संघाचा कर्णधार असताना ही टेस्ट सुरू झाली होती. यामध्ये प्रथम उत्तीर्ण होण्यासाठी १६.१ गुण आवश्यक होते, जे नंतर १६.५ इतके झाले. यो-यो टेस्टशिवाय, बीसीसीआयने खेळाडूंच्या फिटनेसची तपासणी करण्यासाठी डेक्सा (DEXA) स्कॅन देखील सुरू केले आहे. DEXA देखील निवडीच्या पॅरामीटरमध्ये समाविष्ट आहे. गेल्या वर्षी आशिया चषक आणि टी-२० विश्वचषकात टीम इंडियाच्या खराब निकालानंतर बीसीसीआयने फिटनेसचे हे कठोर मापदंड स्वीकारले आहेत.