कृषीसंस्कृतीतील एक अनोखी प्रथा ‘पाव्हणेर’!

WhatsApp Group

मुंबई : ग्रामीण भागात सर्रास वापरला जाणारा शब्द म्हणजे पाव्हणेर. खरंतर पाहुणचार या शब्दाचा मूळ शब्द म्हणायला हवा, कारण हा मराठीतील खूप जुना शब्द आहे. पाहुण्यांना घरी बोलवून त्यांचा यथोच्च भोजन देऊन सन्मान करण्याला पाव्हणेर म्हणतात. अर्थात ही गोष्ट सधन शेतकऱ्यांच्या बाबतीत सहज लागू होणारी आहे. पण लांबून गाव जसे दिसते तसे नसते. सधन शेतकऱ्यांच्या तुलनेत निर्धन शेतकऱ्यांचीच संख्या गावात सर्वाधिक असते. अशावेळी या शेतकऱ्यांवर संकटं दबा धरुनच असतात. शेतकऱ्याचं जगणं हे बऱ्याच अंशी निसर्गावर अवलंबून असतं. रोजच्या जीवनात अनेक संकटांचा सामना करीत ही माणसे जगत असतात. पण गावगाड्यात त्यांना जगण्याला उभारी देते ती पाव्हणेरची प्रथा. होय पाव्हणेर ही एक प्रथादेखील आहे.

शेतीची मशागत करताना खूप सारी कामं योग्यवेळी पार पाडावी लागतात. पाऊस सुरू होण्यापूर्वी पेरणी पार पडणं आवश्यक असतं. त्यामुळे पेरणी पूर्व मशागत त्यामध्ये नांगरट करणे, बांध घालणे, कुळवणे, पाटा मारणे अशी कामं असतात. धुळ पेरणीसाठी हे सर्व वेळेत होणे आवश्यक ठरते. त्यानंतर योग्यवेळी पेरणी, त्यानंतर उगवून आलेल्या पिकांची देखभल करताना निंदणी, भांगलणी, कोळपणी इत्यादी ते पिक कापणीचा हंगाम म्हणजेच सुगीपर्यंतच्या कामांचा यात समावेश होतो. या कामाच्या काळात शेतकऱ्यांच्या घरात एक प्रकारची धांदल उडालेली असते. शेती कामाला माणसं मिळत नाहीत. शेतमजूरही मिळणे मुश्कील होते. मात्र, काही शेतकऱ्यांची कामे योग्यवेळी पार पडत नाहीत. एखाद्या शेतकऱ्याची ऐनवेळी अडचण तयार होते. काहीवेळा एखादी दुःखद घटनाही घडून जाते. अशावेळी त्या कुटुंबाचा जर शेतीचा हंगाम निघून गेला तर संपूर्ण कुटुंबावर याचा ताण येतो. अशा प्रसंगात ग्रामीण भागात काही परंपरेने चालत आलेल्या काही प्रथा परंपरा आहेत त्यापैकीच एक पाव्हणेर.

ज्या शेतकऱ्याचे शेतीचे कोणतेही महत्त्वाचे काम अडखळले आहे, तो आपल्या सर्व परिचीतांना पाव्हणेरचं आमंत्रण देतो. मग त्या शेतकऱ्याचे काम किती मोठे आहे याचा अंदाज घेवून काम करणारे हात वाढवतात व एकाच दिवसात ते संपूर्ण काम सारेजण मिळून पार पाडतात. या मोबदल्यात दुपारी यजमान शेतकरी सर्वांच्या भाजी भाकरीची व्यवस्था करतो. त्यानंतर काम पूर्ण झाल्याचा समाधानार्थ गोडधोडाचं यथाशक्ती जेवणही आयोजित करतो. या पाव्हणेरच्या प्रथेमुळे गरजू शेतकऱ्यावर आलेले संकट स्वतःवरचे संकट माणून गावातील भावकी, शेजारी पाजारी, ओळखीचे स्नेही मिळून परतवून लावतात. पाव्हणेरची ही प्रथा कृषीसंस्कृतीतील एक महत्त्वाची प्रथा आहे आणि ती शेकडो वर्षापासून अबाधित आहे.

Leave a comment