MiG-21 विमानाचा भारतीय इतिहास वाचलाय का? ६२ वर्षात झाले आहेत २०० अपघात!

WhatsApp Group

मुंबई : राजस्थानच्या बाडमेर जिल्ह्यात गुरुवारी रात्री हवाई दलाचं विमान मिग-२१ कोसळल्यानंतर ते पुन्हा चर्चेत आलं आहे. या अपघातामुळं सोव्हिएत वंशाच्या मिग-२१ विमानांवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. या विमानांचा भारतीय हवाई दलाच्या ताफ्यात १९६०च्या दशकाच्या सुरुवातीला समावेश करण्यात आला होता आणि आतापर्यंत ६२ वर्षांत या विमानांचे सुमारे २०० अपघात झाले आहेत. पीटीआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मिग-२१ हे दीर्घकाळ भारतीय हवाई दलाचं मुख्य विमान होतं. मात्र, त्याचा सुरक्षेचा रेकॉर्ड खूपच खराब आहे. विमान अपघातातही अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

या वर्षी मार्चमध्ये संरक्षण राज्यमंत्री अजय भट यांनी राज्यसभेत सांगितलं की, गेल्या पाच वर्षांत तीन सेवांच्या विमान आणि हेलिकॉप्टरच्या अपघातात ४२ संरक्षण जवानांचा मृत्यू झाला आहे. गेल्या पाच वर्षांत एकूण ४५ विमान अपघात झाले, त्यापैकी २९ भारतीय हवाई दलाच्या प्लॅटफॉर्मचा समावेश आहे. एकेकाळी फायटर जेट मिग-२१ विमानांना भारतीय हवाई दलाचा कणा मानला जात असे. पण आता ही विमानं ना युद्धासाठी योग्य आहेत ना उड्डाणासाठी. मात्र, बालाकोट हवाई हल्ल्यानंतर मिग-२१ बायसन विमानानंच पाकिस्तानी लढाऊ विमानांवर कुरघोडी केली होती. हवाई दल १९६० पासून मिग-२१ विमानं वापरत आहे.

बाडमेरमध्ये काय घडलं?

राजस्थानमधील बारमेरजवळ गुरुवारी रात्री प्रशिक्षणादरम्यान मिग-२१ विमानाचा अपघात झाला. या अपघातात भारतीय हवाई दलाच्या (IAF) दोन वैमानिकांचा मृत्यू झाला. आयएएफनं सांगितलं, की दोन आसनी मिग-२१ ट्रेनर विमान उतरलाई विमानतळावरून उड्डाण करत होतं. रात्री ९.१०च्या सुमारास हा अपघात झाला. हे विमान मिग-२१ होतं. भीमडा परिसरात जिथं विमान कोसळलं, तिथं अर्धा किलोमीटर परिसरात मलबा विखुरलेला आढळला. वैमानिकाची ओळख अद्याप हवाई दलाकडून सांगण्यात आलेली नाही. मिग-२१ विमान कोसळल्याची माहिती मिळताच जिल्हाधिकारी, एसपी यांच्यासह हवाई दलाचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.

हेही वाचा – BGMI खेळणाऱ्यांसाठी धक्का..! PUBG नंतर हा गेमही भारतात बॅन? काय झालंय वाचा!

भारतीय हवाई दलानं एका निवेदनात म्हटलं, ”भारतीय वायुसेनेचे एक दुहेरी आसनी मिग-२१ ट्रेनर विमान आज संध्याकाळी राजस्थानमधील उत्तरलाई विमानतळावरून प्रशिक्षणासाठी उड्डाण करत होतं. रात्री ९.१०च्या सुमारास बाडमेरजवळ विमान कोसळलं. दोन्ही पायलट गंभीर जखमी झाले. वैमानिकांच्या नुकसानाबद्दल भारतीय वायुसेनेला मनापासून खेद आहे आणि शोकाकुल कुटुंबियांसोबत उभं आहे. अपघाताचं कारण शोधण्यासाठी कोर्ट ऑफ इन्क्वायरीचे आदेश देण्यात आल्याचं हवाई दलानं सांगितलं.”

राजनाथ सिंह म्हणाले..

अपघातानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी एअर चीफ मार्शल व्हीआर चौधरी यांच्याशी चर्चा केली. सिंह यांनी ट्वीट करून दोन वैमानिकांच्या मृत्यूबद्दल शोक व्यक्त केला आहे. सिंह म्हणाले, ”राजस्थानमधील बारमेरजवळ भारतीय हवाई दलाच्या मिग-२१ ट्रेनर विमानाच्या अपघातात दोन हवाई योद्धा मृत झाल्यामुळं खूप दुःख झाले. त्यांची देशसेवा कधीही विसरता येणार नाही. या दु:खाच्या प्रसंगी माझे विचार शोकाकुल कुटुंबियांसोबत आहेत.”

Leave a comment