कोरोना लसीकरणात भारतानं रचला इतिहास..! २०० कोटींचा टप्पा पार; पंतप्रधान मोदी म्हणाले…

WhatsApp Group

मुंबई : चीनमध्ये कोरोना जन्माला आला आणि जगात भयंकर हाहाकार उडाला. त्यानंतर लस निर्माण झाल्यानंतर सर्वांनी सुटकेचा निश्वास टाकला. डॉक्टर, वैद्यकीत सुविधा पुरवणाऱ्यांनी मेहनत घेत कोरोना काळात लोकांची काळजी घेतली. भारतानं रविवारी १८ महिन्यांत कोविड-१९ लसीकरणाचा विक्रमी २०० कोटींचा टप्पा ओलांडला. भारतानं गेल्या वर्षी १६ जानेवारीपासून राष्ट्रीय कोविड लसीकरण मोहीम सुरू केली होती. को-विन पोर्टलनुसार, रविवारी आतापर्यंत एकूण १.९१ लाख लसी देण्यात आल्या आहेत. या क्रमांकाच्या मदतीनं एक नवीन स्थान प्राप्त झाले. शनिवारी रात्रीपर्यंत देशभरात एकूण १९९.९७ कोटी कोविड लसीचे डोस देण्यात आले.

फक्त १८ महिन्यांत…

१६ जानेवारी २०२१ रोजी भारत सरकारनं कोरोनाविरुद्धच्या लढाईत भारतीय लोकांसाठी कोव्हॅक्सीन आणि कोविशील्ड या दोन लसी उपलब्ध करून दिल्या. ९ महिन्यांनंतर, भारतानं २१ ऑक्टोबर २०२१ रोजी १०० कोटी लसीकरणाचा विक्रम केला. ९ महिन्यांनंतर पुन्हा १ जुलै २०२२ रोजी २०० कोटींचा आकडा पूर्ण करून एक नवा टप्पा गाठला आहे.

काय म्हणाले मोदी?

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रसंगी ट्वीट केले आणि म्हटले, “भारतानं पुन्हा इतिहास रचला आहे. २०० कोटी लसींचा टप्पा ओलांडल्याबद्दल सर्व भारतीयांचं अभिनंदन. ज्यांनी भारताची लसीकरण मोहीम वाढवली त्यांचा अभिमान आहे. कोविड १९ विरुद्धच्या जागतिक लढ्याला बळ दिलं आहे.”

या ऐतिहासिक प्रसंगी देशाचे अभिनंदन करताना केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया म्हणाले की, भारतानx एक नवा विक्रम केला आहे. मांडविया यांनी ट्वीटमध्ये म्हटले की, “भारतानं केवळ १८ महिन्यांत २०० कोटी लसीकरणाचं लक्ष्य पूर्ण करून एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. या यशाबद्दल सर्व देशवासियांचे हार्दिक अभिनंदन. हा दिवस नेहमी लक्षात ठेवला पाहिजे.”

डॉ. पूनम खेत्रपाल सिंग, प्रादेशिक संचालक, WHO दक्षिण-पूर्व आशिया यांनी देखील २०० कोटी कोविड-१९ लसीचे डोस उपलब्ध करून दिल्याबद्दल भारताचं अभिनंदन केलं. त्यांनी लिहिलं, “कोविड-१९ लसीचे डोस वितरित केल्याबद्दल भारताचं अभिनंदन. सध्या सुरू असलेल्या साथीच्या रोगाचा प्रभाव कमी करण्याच्या देशाच्या वचनबद्धतेचा आणि प्रयत्नांचा हा आणखी एक पुरावा आहे. सर्व प्रकारच्या कोविड-१९ लसी उपलब्ध आहेत. लस मिळाल्यानंतरही महामारी आपल्या आजूबाजूला आहे हे आपण विसरता कामा नये, व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी आपण सर्व खबरदारीच्या उपाययोजना केल्या पाहिजेत.”

 

Leave a comment