

मुंबई : भारतीय संघाचा स्टार फलंदाज केएल राहुल लवकरच विवाहबंधनात अडकणार आहे. अभिनेता सुनील शेट्टीची लेक अथिया शेट्टी आणि केएल राहुल दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये आहेत. अलीकडेच राहुलच्या शस्त्रक्रियेनंतर अथिया जर्मनीहून परतली आहे. राहुल पाठीच्या शस्त्रक्रियेसाठी जर्मनीला गेला होता आणि त्यामुळे तो प्रथम दक्षिण आफ्रिका नंतर इंग्लंड मालिकेतून बाहेर पडला. ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आशिया कप टी-२० स्पर्धेतही त्याची प्रवेशाची शक्यता कमी आहे. या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक होणार असल्यानं संघ व्यवस्थापनही त्याच्या कमबॅकची घाई करत नाही. अशा परिस्थितीत, राहुल पूर्णपणे तंदुरुस्त होऊ शकतो.
माध्यमांच्या वृत्तानुसार, केएल राहुल आणि अथिया शेट्टी येत्या तीन महिन्यांत मुंबईत लग्न करू शकतात. मिळालेल्या माहितीनुसार, दोन्ही कुटुंबांसाठी एक भव्य कार्यक्रम होणार असून अथिया स्वतः तयारी पाहत आहे. एका सूत्राने सांगितलं की नुकतेच ते दोघेही त्यांच्या कुटुंबातील सदस्यांसह नवीन घर पाहण्यासाठी आले होते. सध्या या घराच्या नूतनीकरणाचं काम जोरात सुरू आहे. आयपीएल २०२२मध्ये राहुलनं बॅटनं अप्रतिम कामगिरी करताना ६००हून अधिक धावा केल्या होत्या. त्याच्या नेतृत्वाखाली लखनऊ सुपर जायंट्सचा संघही प्लेऑफमध्ये पोहोचला.
अथियाचं बॉलिवूड करियर ठरलंय फ्लॉप..
अथिया शेट्टीचं बॉलिवूड करिअर काही खास नाही. सलमान खानच्या प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली बनलेल्या ‘हिरो’ या चित्रपटातून तिनं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर अपेक्षेनुसार कमाई करू शकला नाही. यानंतर अथिया अर्जुन कपूरसोबत मुबारकान चित्रपटात दिसली. हा चित्रपटही सरासरीचा होता. त्यानंतर अथियानं नवाजुद्दीन सिद्दीकीसोबत ‘मोतीचूर चकनाचुर’ या चित्रपटातही काम केलं. हा चित्रपट कधी आला आणि कधी गेला हे कळलं नाही. त्यानंतर ती कोणत्याही चित्रपटात दिसली नाही.
अथिया आणि राहुलनं गेल्या वर्षी सोशल मीडियावर त्यांचं नातं जगजाहीर केलं होतं. अहान शेट्टीच्या ‘तडप’ या चित्रपटाच्या स्क्रिनिंगमध्ये दोघांनी पहिल्यांदाच एकत्र दिसल्यावर त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झालं. या वर्षी एप्रिल २०२२ मध्ये अथियानं राहुलसोबत त्याच्या वाढदिवशी काही सुंदर फोटो शेअर केले होते.
ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये ऑस्ट्रेलियामध्ये टी-२० विश्वचषकाचे सामने होणार आहेत. तोपर्यंत केएल राहुल फिट होऊ शकतो. टीम इंडियासाठी तो तिन्ही फॉरमॅटमध्ये सातत्याने चांगली कामगिरी करत आहे. टी-२० क्रिकेटमध्ये शतक झळकावणाऱ्या पाच भारतीय खेळाडूंच्या यादीतही त्याचा समावेश आहे.