

Lance Naik Chandrashekhar Harbola : आज १५ ऑगस्ट रोजी संपूर्ण देश स्वातंत्र्याचा ७५वा वर्धापन दिन अमृत महोत्सव म्हणून साजरा करत आहे. त्याचवेळी सियाचीनमध्ये शहीद झालेल्या जवानाचं पार्थिव ३८ वर्षांनंतर उत्तराखंडमधील हल्दवानी येथील त्यांच्या घरी येत आहे. १९ कुमाऊँ रेजिमेंटचे जवान चंद्रशेखर हरबोला यांचं पार्थिव घरी येणार आहे. २९ मे १९८४ रोजी सियाचीनमध्ये ऑपरेशन मेघदूत दरम्यान हरबोला यांना आपला जीव गमवावा लागला होता. ऑपरेशन मेघदूतमधील सैनिकांचे शौर्य आणि अदम्य साहस आजही लोक विसरलेले नाहीत. जगातील सर्वात दुर्गम रणांगणावर भारतीय जवानांच्या पराक्रमाची गाथा आजही लोकांच्या मनात जिवंत आहे. भारतीय लष्करानं १३ एप्रिल १९८४ रोजी सियाचीन ग्लेशियरमध्ये ऑपरेशन मेघदूत सुरू केलं.
ऑपरेशन मेघदूत दरम्यान बर्फाच्या वादळात १९ सैनिक गाडले गेले, त्यापैकी १४ जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. मात्र पाच जवानांचे मृतदेह सापडले नाहीत. यानंतर लष्कराने पत्राद्वारे चंद्रशेखर यांच्या शहीद झाल्याची माहिती कुटुंबीयांना दिली होती. त्यानंतर कुटुंबीयांनी चंद्रशेखर हरबोला यांच्या पार्थिवावर डोंगरी प्रथेनुसार अंत्यसंस्कार केले.
डिस्क क्रमांकामुळं पटली ओळख
यावेळी सियाचीन ग्लेशियरवर बर्फ वितळू लागल्यावर हरवलेल्या सैनिकांचा शोध सुरू करण्यात आला. १३ ऑगस्ट रोजी सियाचीनमध्ये १६,००० फुटांपेक्षा जास्त उंचीवर एका सैनिकाचा सांगाडा सापडला होता. अवशेषांसह सैन्य क्रमांक असलेली डिस्क देखील सापडली, ज्यावरून त्याचा मृतदेह शोधण्यात आला. या डिस्कनं सैनिकाची ओळख पटवण्यात खूप मदत केली. त्यावर लष्कराचा क्रमांक (४१६४५८४) लिहिला होता.
१९८४ मध्ये लष्कराचे लान्स नाईक चंद्रशेखर हरबोला यांचे वय केवळ २८ वर्षे होते. त्याच वेळी त्यांची मोठी मुलगी ८ वर्षांची आणि धाकटी मुलगी ४ वर्षांची होती. पत्नीचं वय २७ वर्षे होते. आता ३८ वर्षांनंतर शहीद चंद्रशेखर यांचा मृतदेह सियाचीनमध्ये बर्फाखाली गाडलेला सापडला असून, आज १५ ऑगस्ट रोजी म्हणजेच स्वातंत्र्यदिनी त्यांच्या घरी आणून पूर्ण शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
आता मुलगी झालीय ४८ वर्षांंची!
शहीद चंद्रशेखर हरबोला यांची पत्नी शांती देवी (६५ वर्षे) यांच्या डोळ्यातील अश्रू जवळपास सुकले आहेत, कारण त्यांचे पती या जगात नाही हे त्यांना यापूर्वीच माहीत होते. शेवटच्या क्षणी आपल्या नवऱ्याचा चेहरा बघू शकले नाही, याचे दु:ख त्यांना आहे. हरबोला यांची ४८ वर्षीय मुलगी कविता पांडे यांनी सांगितलं, की वडिलांच्या निधनाच्या वेळी त्या खूप लहान होती. अशा स्थितीत त्याला वडिलांचा चेहरा आठवत नाही. आता जेव्हा त्याचा मृतदेह त्याच्या घरी पोहोचेल, तेव्हाच त्याला त्याचा चेहरा पाहायला मिळेल.
हेही वाचा – Independence Day : भारतावर राज्य करणाऱ्या ‘ईस्ट इंडिया कंपनी’चा मालक आज एक भारतीय आहे!
एक दिवसापूर्वीच चंद्रशेखर हरबोला आणि त्यांच्यासोबत असलेल्या आणखी एका जवानाचा मृतदेह सियाचीनमध्ये सापडला आहे. आता त्यांचे पार्थिव आज १५ ऑगस्ट रोजी पॅडी मिल येथील त्यांच्या निवासस्थानी आणले जाणार आहे. ज्यांच्या पार्थिवावर राणीबागेतील चित्रशाळा घाटावर पूर्ण शासकीय सन्मानानं अंत्यसंस्कार करण्यात येतील.