भारताशिवाय १५ ऑगस्टला स्वतंत्र झालेले देश माहितीयेत का? वाचा या दिवसाबद्दलच्या रंजक गोष्टी!

WhatsApp Group

मुंबई : या १५ ऑगस्टला भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होतील. भारतभूमीला स्वतंत्र करण्यासाठी अनेक वीरांनी आपलं रक्त सांडलं आहे. हा केवळ स्वतंत्र होऊन आनंद साजरा करण्याचा दिवस नाही तर त्या शूरवीरांच्या बलिदानाचं स्मरण करण्याचाही दिवस आहे. इंग्रजांनी आपल्या देशावर २०० वर्षे राज्य केलं. १५ ऑगस्ट १९४७ च्या रात्री त्यांच्या गुलामगिरीतून आपल्याला स्वातंत्र्य मिळालं. हा दिवस देशाच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा दिवस आहे. पण तुम्हाला माहितीये का, की या दिवशी भारताव्यतिरिक्त अजुनही देश आहेत जे स्वतंत्र झाले. या देशांमध्ये स्वातंत्र्याचा उत्सव १५ ऑगस्टला साजरा केला जातो.

कोणते आहेत ते देश?

जगातील दुसऱ्या क्रमांकाची लोकसंख्या असलेल्या भारताव्यतिरिक्त, दक्षिण कोरिया, बहरीन, काँगो आणि लिकटेंस्टाईनमध्येही १५ ऑगस्ट रोजी स्वातंत्र्य दिन साजरा केला जातो. ब्रिटनची वसाहत असलेल्या बहरीनला १५ ऑगस्ट १९७१ रोजी स्वातंत्र्य मिळालं. दक्षिण कोरियाला १५ ऑगस्ट १९४५ रोजी जपानपासून स्वातंत्र्य मिळालं. याशिवाय काँगोला १५ ऑगस्ट १९६० रोजी फ्रान्सपासून आणि १५ ऑगस्ट १८६६ रोजी लिकटेंस्टीनला जर्मनीपासून स्वातंत्र्य मिळालं. या देशांमध्येही दरवर्षी १५ ऑगस्टला हा उत्सव साजरा केला जातो.

हेही वाचा – Har Ghar Tiranga Abhiyan : २० वर्षांपूर्वी घरांवर तिरंगा फडकवणं बेकायदेशीर होतं! वाचा आपल्या राष्ट्रध्वजाबाबत…

१५ ऑगस्टशी संबंधित काही रंजक गोष्टी…

तुम्हाला जाणून आश्चर्य वाटेल. पण, जेव्हा पहिल्यांदा पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांनी लाल किल्ल्यावर तिरंगा फडकवला. तेव्हा राष्ट्रगीत गायलं जात नव्हतं. राष्ट्रगीत ‘जन गण मन’ हे रवींद्रनाथ टागोर यांनी १९११ मध्येच लिहिलं होतं. मात्र तोपर्यंत याला राष्ट्रगीताचा दर्जा मिळाला नव्हता. १९५० मध्ये ते राष्ट्रगीत बनलं आणि तिरंगा फडकवल्यानंतर सन्मानार्थ गायलं गेलं.

आपल्या भारतातील चलनाचा इतिहास सुमारे २५०० वर्षांचा आहे. १९१७ मध्ये एक रुपया १३ डॉलर इतका होता. पण, १९४७ मध्ये भारत स्वतंत्र झाला. मग एक रुपया एक डॉलर इतका कमी झाला. मात्र, स्वातंत्र्याच्या वेळी देशावर कर्ज नव्हतं.

आज देशात असे अनेक प्रदेश आहेत, जे १५ ऑगस्ट १९४७ रोजी भारताचा भाग बनले नव्हते. त्यापैकी एक भोपाळ. या संस्थानाच्या नवाबांना पाकिस्तानचा भाग बनायचं होतं. १ जून १९४९ रोजी भोपाळ भारताचा भाग बनला आणि येथे प्रथमच तिरंगा फडकवण्यात आला.

हेही वाचा – तुमची बँक बुडाली तर तुम्हाला किती पैसे परत मिळतील? जाणून घ्या…

स्वातंत्र्याचे महान नायक महात्मा गांधी यांनी पंडित नेहरूंचं ‘ट्रिस्ट विथ डेस्टिनी’ हे ऐतिहासिक भाषण ऐकलं नव्हतं. १४ ऑगस्टच्या रात्री नेहरूंनी व्हाईसरॉय लॉजमधून हे महत्त्वाचं भाषण सुरू केलं. हे भाषण संपूर्ण जगानं ऐकलं. पण, महात्मा गांधी त्या दिवशी रात्री ९ वाजता झोपायला गेले होते आणि त्यांनी भाषणही ऐकलं नव्हतं.

ब्रिटनला १९४७ मध्ये नव्हे तर १९४८ साली भारत मुक्त करायचा होता, पण महात्मा गांधींच्या ‘भारत छोडो’ आंदोलनासमोर गुडघे टेकत ब्रिटिशांनी १९४७ मध्येच भारत स्वतंत्र केला. १५ ऑगस्ट ही स्वातंत्र्याची तारीख निश्चित करण्याचा निर्णय लॉर्ड माउंटबॅटन यांनी घेतला होता.

Leave a comment