

मुंबई : उन्हाळा हा ऋतू फिरण्यासाठी किंवा पिकनिकसाठी सगळ्यात त्रासदायक वाटतो. उन्हाळ्यात घराबाहेर पडणं आणि घरात राहणंही तितकंच कठीण होतं. वाढत्या तापमानामुळं कुठंही फिरायला जावंसं वाटत नाही, पण उन्हापासून दिलासा मिळाला म्हणजेच पावसाळा आला की लोकांचे प्लॅन ठरतात. भारतात मान्सूनचं आगमन झालं की भटकंती सुरू होते. आपले फोटो कुठे चांगले येतील, असे विचार करणारेही आपल्याला सापडतात. अशा परिस्थितीत, सुट्टीचा आनंद घेण्यासाठी तुम्हीसुद्धा या ५ ठिकाणांना भेट देण्याचा प्लॅन बनवू शकता.
गोव्याच्या किनाऱ्यावर घ्या सुट्टीचा आनंद
फिरण्याचा विचार करत असाल तर गोव्याकडं दुर्लक्ष करणं चुकीचं आहे. गोव्याच्या सुंदर समुद्रकिनाऱ्यावर तुम्ही तुमचा/तुमची जोडीदार, कुटुंब आणि मित्रांसह आनंद घेऊ शकता. समुद्रकिनारी वसलेल्या गोव्यात मान्सूनचं आगमन झाल्यानंतर वातावरण अधिकच प्रसन्न होतं. येथे तुम्ही पालोलेम बीच, बागा बीच, दूधसागर वॉटरफॉल, बॉम जीसस बॅसिलिका, अगुआडा फोर्ट, सॅटर्डे नाईट मार्केट, मंगेशी मंदिर आणि अंजुना बीच यासारख्या अनेक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देऊ शकता.
अरुणाचल प्रदेश देखील एक उत्तम ठिकाण
अरुणाचल प्रदेश हे निसर्गसौंदर्य पाहण्यासाठी उत्तम ठिकाण आहे. मान्सूनचं आगमन होताच येथील दृष्य अधिक आकर्षक दिसतात. पाऊस पडल्यानंतर अरुणाचल प्रदेशचं सौदर्य आणखी खुलून दिसतं. इथल्या निसर्गसौंदर्याचा आनंद लुटण्यासोबतच काही काळ शांततेत घालवण्यासाठी तुम्ही अरुणाचल प्रदेशच्या सहलीचीही योजना करू शकता.
आसाम आहे एकदम योग्य
आसाममध्ये पावसाळ्यात फिरण्याची एक वेगळीच मजा असते. इथं अनेक सुंदर ठिकाणं आहेत. इथं बनवलेलं काझीरंगा राष्ट्रीय उद्यान हे अतिशय प्रसिद्ध उद्यान आहे. अशा परिस्थितीत, सुट्टीतील नैसर्गिक दृश्यांचा आनंद घेण्यासाठी आसाम हे एक उत्तम ठिकाण आहे.
मेघालयच्या हिरवळीचा लुटा आनंद
मेघालयची हिरवळ पाहण्यासारखी आहे. पावसाळ्यात सहलीचं नियोजन करण्यासाठी शिलाँग हा एक उत्तम पर्याय आहे. इथे काही प्रसिद्ध टेकड्या देखील आहेत जिथे तुम्ही कुटुंब आणि मित्रांसह आनंद घेऊ शकता.
महाराष्ट्रातही लुटा पावसाळ्याचा आनंद
भारतातील सर्वात प्रसिद्ध हिल स्टेशनच्या यादीत महाराष्ट्रातील महाबळेश्वरचं नाव येतं. निसर्गरम्य दृश्यं आणि पावसाचा आनंद घेण्यासाठी महाराष्ट्र हे एक उत्तम ठिकाण आहे. जर गोव्याचा प्लॅन परवडत नसेल तर समुद्रानं वेढलेल्या कोकणाचा आनंदही तुम्ही पावसाळ्यात घेऊ शकता. यात देवगड, आचरा, मालवण, तारकर्ली, विजयदुर्ग, वेंगुर्ला, तोंडवली अशा ठिकाणी तुम्ही राहू शकतात. राहण्याखाण्याची उत्तम सोय आणि कमी खर्च यांचं समीकरण अचूक जुळू शकतं.