

मुंबई : अलीकडेच अनेक बँकांची अवस्था बिकट असल्याची आपण कित्येक वेळा वाचतो. त्यामुळं लोकही आपापल्या बँकांविषयी चिंतीत असतात. समजा तुमची बॅँकच बुडाली तर काय होईल किंवा तुम्हाला किती पैसे परत मिळतील हे तुम्हाला माहितीये का? वर्षभरापूर्वीच्या नियमानुसार बँक बुडाल्यास तुम्हाला जास्तीत जास्त एक लाख रुपये मिळायचे.
हा नियम बदलण्यासाठी, केंद्रीय अर्थसंकल्प २०२१ मध्ये, अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी ठेव विमा आणि क्रेडिट गॅरंटी कॉर्पोरेशन कायदा (DICGC) मध्ये सुधारणा करण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर कायदा बदलला आणि विम्याच्या रकमेची मर्यादा एक लाख रुपयांवरून पाच लाख रुपये करण्यात आली. सुमारे २८ वर्षानंतर, या विम्याच्या रकमेची मर्यादा वाढवण्यात आली. वास्तविक, डिपॉझिट इन्शुरन्स ही एक प्रकारची योजना आहे, ज्या अंतर्गत बँकेच्या अपयशानंतर, ग्राहकांचं जास्तीत जास्त पाच लाख रुपये सुरक्षित राहतात.
हेही वाचा – रिझर्व्ह बँकेनं पुन्हा वाढवला रेपो रेट; काय महाग होणार? वाचा एका क्लिकवर!
काय बदललं?
या बदलानंतर, ठेवीदारांना बँकेच्या लिक्विडेशन प्रक्रियेतून जाण्याची वाट पाहावी लागणार नाही, तरच ते त्यांच्या ठेव रकमेवर दावा करू शकतात. जर एखादी बँक देखील मोरेटोरियममध्ये असेल, तर ठेवीदार त्याच्या रकमेवर DICGC कायद्यानुसार दावा करू शकतो. दुसर्या भाषेत याचा अर्थ असा की, नवीन दुरुस्तीमुळं त्या बँकांच्या हजारो ठेवीदारांना दिलासा मिळेल, जे दीर्घकाळ स्थगितीमध्ये आहेत.
किती परतावा मिळणार?
DICGC कायदा, १९६१च्या कलम १६(१)च्या तरतुदींनुसार, बँक बुडाली किंवा दिवाळखोर झाली तर, DICGC प्रत्येक ठेवीदाराला पैसे देण्यास जबाबदार आहे. त्याच्या ठेव रकमेचा पाच लाख रुपयांपर्यंत विमा असेल. तुमचे एकाच बँकेच्या अनेक शाखांमध्ये खातं असल्यास, जमा रक्कम आणि व्याज सर्व खात्यांमध्ये जोडलं जाईल आणि फक्त पाच लाखांपर्यंतच्या ठेवी सुरक्षित समजल्या जातील. यामध्ये मुद्दल आणि व्याज या दोन्ही गोष्टींचा समावेश आहे. हे स्पष्ट आहे की जर दोन्ही ५ लाखांपेक्षा जास्त असतील तर फक्त ५ लाख सुरक्षित मानले जातील.
हेही वाचा – ….तेव्हा शाहरुख खानच्या प्रॉडक्शन कंपनीच्या गेटवरून संतोष जुवेकरला हाकलवण्यात आलं!
पैसे जमा करण्यापूर्वी आवश्यक माहिती
कोणत्याही बँकेची नोंदणी करताना, DICGC त्यांना एक छापील पत्रक देते, ज्यामध्ये ठेवीदारांना उपलब्ध असलेल्या विम्याची माहिती असते. कोणत्याही ठेवीदाराला याबाबत माहिती हवी असल्यास ते बँकेच्या शाखेच्या अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती घेऊ शकतात.
तुमच्याकडे दोन खाती असल्यास काय होईल?
DICGC द्वारे विम्याच्या रक्कम मोजताना, एकाच व्यक्तीची एकाच बँकेत असलेली सर्व खाती विचारात घेतली जातात. जर हे फंड वेगवेगळ्या प्रकारच्या मालकीचे असतील किंवा वेगवेगळ्या बँकांमध्ये ठेवी असतील, तर विम्याची रक्कम वेगळी असेल. समजा तुम्ही दोन बँकांमध्ये खातं उघडलं असेल तर या दोन्ही खात्यांमध्ये जास्तीत जास्त ५-५ लाख रुपयांचा विमा उतरवला जाईल.