

Cyrus Mistry Road Accident : टाटा सन्सचे माजी अध्यक्ष आणि उद्योगपती सायरस मिस्त्री यांचं रविवारी कार अपघातात निधन झालं. मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला कारनं जात होते. त्यांची कार मुंबईजवळ दुभाजकाला धडकली आणि हा अपघात झाला. प्राथमिक तपासात पोलिसांनी अपघाताचं कारण ओव्हरस्पीडिंग आणि चुकीच्या बाजूनं ओव्हरटेक केल्याचं सांगितलं आहे. भारतात दररोज ४२६ हून अधिक लोकांचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. त्याचबरोबर रस्ते अपघातांचं सर्वात मोठं कारण म्हणजे ओव्हरस्पीडिंग. जागतिक बँकेच्या म्हणण्यानुसार, भारतात दर ४ मिनिटाला एका व्यक्तीचा रस्ता अपघातात मृत्यू होतो.
दर तासाला १८ जणांचा मृत्यू होतोय!
नॅशनल क्राइम रेकॉर्ड ब्युरो (NCRB) च्या अहवालानुसार, २०२१ मध्ये देशभरात ४.०३ लाखांहून अधिक रस्ते अपघात झाले. यामध्ये १.५५ लाखांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला. म्हणजेच दररोज ४२६ हून अधिक लोकांना रस्ते अपघातात जीव गमवावा लागतो. त्यानुसार दर तासाला १८ जणांचा मृत्यू झाला. त्याच वेळी, ६० टक्के रस्ते अपघातांचं कारण ओव्हरस्पीडिंग आहे. गेल्या वर्षी ४.०३ लाख अपघातांपैकी २.४० लाख अपघात आणि मृत्यू हे ओव्हरस्पीडिंगमुळं झाले होते. ओव्हरस्पीडिंगमुळं रस्ते अपघातात ८७,५०० लोकांचा मृत्यू झाला, तर २.२८ लाखांहून अधिक लोक जखमी झाले.
हेही वाचा – टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन
राष्ट्रीय महामार्गावर सर्वाधिक अपघात
एनसीआरबीच्या अहवालानुसार गेल्या वर्षी सर्वाधिक रस्ते अपघात राष्ट्रीय महामार्गावर झाले. गेल्या वर्षी देशभरात राष्ट्रीय महामार्गांवर १.२२ लाख रस्ते अपघात झाले होते. या अपघातांमध्ये ५३,६१५ लोकांचा मृत्यू झाला. त्याचवेळी राज्य महामार्गावर झालेल्या ९६,४५१ अपघातांमध्ये ३९ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. तर, इतर प्रकारच्या रस्त्यांवर १.८४ लाख अपघात झाले, ज्यामध्ये ६२,९६७ लोकांना आपला जीव गमवावा लागला. या अहवालात राष्ट्रीय महामार्गावर दर १०० किमीवर ४० लोकांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आलं आहे. त्याच वेळी राज्य महामार्गावर दर १०० किमीवर २१ जीव गमावले. तर, देशाची सरासरी काढली तर दर १०० किमीवर २ लोकांचा मृत्यू झाला.
दु:खद बातमी..!
टाटा सन्सचे माजी चेअरमन सायरस मिस्त्री यांचं कार अपघातात निधन#TATA #CyrusMistry #chairman #accident #vachamarathi pic.twitter.com/doJhX8xzCi
— Vacha Marathi (@VachaMarathi) September 4, 2022
हेही वाचा – सायरस मिस्त्री आणि रतन टाटा यांचं नेमकं कशामुळं वाजलं? वाचा इथं!
भारतातील रस्त्यांचा दर्जा सर्वात वाईट
लंडन विद्यापीठाच्या अहवालानुसार भारतातील रस्त्यांचा दर्जा सर्वात वाईट आहे. भारतातील फक्त 3 टक्के रस्ते हे राष्ट्रीय महामार्ग आहेत, तर ७५ टक्के महामार्ग फक्त दुपदरी आहेत. भारतातील रस्तेही खूप गजबजलेले आहेत. ४० टक्के रस्ते अस्वच्छ आहेत आणि ३० टक्क्यांपेक्षा जास्त गावांमध्ये अद्याप रस्ता पोहोचलेला नाही. गेल्या वर्षी रस्ता सुरक्षेबाबत जागतिक बँकेचा अहवाल आला होता. या अहवालात असं सांगण्यात आलं की, दर १०० अपघातांपैकी ११ अपघात भारतात होतात.
मिस्त्रींच्या गाडीत कोण होतं?
सायरस मिस्त्री अहमदाबादहून मुंबईला येत होते. त्यांच्या व्यतिरिक्त अनाहिता पंडोले, त्यांचा पती दारियस पंडोले आणि भाऊ जहांगीर दिनशा पंडोले गाडीत होते. अनाहिता कार चालवत होत्या. त्या एक प्रसिद्ध स्त्रीरोगतज्ज्ञ होत्या. या अपघातात सायरस मिस्त्री आणि जहांगीर यांचा मृत्यू झाला. तर पंडोले दाम्पत्य गंभीर जखमी झाले आहे. अपघातानंतर सायरस मिस्त्री यांना कासा येथील शासकीय रुग्णालयात आणण्यात आलं. डोक्याला दुखापत झाल्यानं मिस्त्री यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टर शुभम सिंह यांनी सांगितलं. त्याचवेळी जहांगीर यांच्या डाव्या पायाला फ्रॅक्चर आणि डोक्याला दुखापत झाली. रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच दोघांचा मृत्यू झाला होता.