

मुंबई : आपल्या देशाला शेतीप्रधान राष्ट्र म्हटलं जातं. दरवर्षी पावसाळा आला, की शेतकऱ्यांच्या शेतीकामांना वेग येतो. खरिपाच्या पेरणीसाठी शेतकरी जमिनीची मशागत करत असतात. पाऊस मोठ्या प्रमाणात केव्हा पडणार आणि माझी जमीन चांगली ओलसर कधी होणार, याचीच शेतकरी वाट बघत असतात. सध्या राज्यात पावसाचं आगमन झालं आहे. राज्यातील काही भागात पाऊस पडतही आहे. त्यामुळे शेतकरी खरिपाच्या पेरणीची तयारी करु लागले आहेत. पण शेतकऱ्यांनी नेमकी पेरणी कधी करावी याची माहिती आपण जाणून घेऊयात…
राज्यातील बहुतांश भागात पावसाचं आगमन झालं आहे. त्यामुळं शेतीकामांना वेग आला आहे. पाऊस नसल्यामुळं शेतीची काम खोळंबली होती, आता त्या कामांना आता वेग आला आला आहे. दरम्यान, १००० मिलीमीटर पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करु नये, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. दुबार पेरणीचं संकट टाळता यावा, यासाठी हे सांगितलं जातं. जर चांगला पाऊस न पडता जर शेतकऱ्यांनी पेरणी केली, तर बियाणं उगवणं किंवा उगवलेलं पीक बऱ्याचदा वाया जाण्याची देखील शक्यता असतो. त्यामुळं तज्ज्ञांनी सांगितलेला सल्ला शेतकऱ्यांनी जरुर ऐकावा.
दुबार पेरणीचं संकट टाळा
महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पाऊस जरी होत असला तरीसुद्धा ७५ ते १०० मिलिमीटर पाऊस झाल्याशिवाय कुठंही शेतकर्यांनी पेरणी करु नये. पेरणीची घाई करु नये, असं मत परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाच्या कृषी तथा व्यवस्थापन तज्ञ कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्राचे गजानन गडदे यांनी व्यक्त केलं आहे. जोपर्यंत शेतात तीन ते चार इंच ओल निर्माण होत नाही, तोपर्यंत पेरणी करणं धोकादायक ठरु शकतं. दुबार पेरणीचं संकट शेतकऱ्यांवर येऊ शकतं, जे आजच्या काळात परवडणार नाही. त्यामुळं शेतकऱ्यांनी लगेच पेरणीची घाई करु नये, असं आवाहन गजानन गडदे यांनी केलं आहे.
पाऊस पडल्यानंतर शेतकऱ्यांनी शेतातील जमिनीची ओल तपासावी. ती ओल जर एक वीतभर गेली असेल, तर पेरणी करण्यास काही हरकत नसल्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. वीतभर ओल गेल्यास पेरणी करायला काही अडचण नाही, त्यामुळं शेतकऱ्यांचं नुकासन होणार नाही. बियाणं चांगलं वापरा, विद्यापीठानं सांगितलेलं बियाणं वापरा असंही तज्ज्ञांनी सांगितलं आहे.