

मुंबई : पैसे देऊन राज्यपालपद विकत घेता येईल का? प्रश्न विचारल्यानंतरच तुम्हाला हसू येईल. पण आपल्या देशात इतके मोठे ठग आहेत की त्यांना राज्यपालपद विकणंही अवघड जाणार नाही. १०० कोटी रुपयांमध्ये राज्यपालपद किंवा राज्यसभेच्या जागा किंवा केंद्र सरकारमधील कोणत्याही उपक्रमाच्या अध्यक्षपद देण्याचं खोटं आश्वासन देऊन लोकांना फसवणाऱ्या चार महाचोरांना केंद्रीय अन्वेषण विभागानं (सीबीआय) पकडलं आहे. याबाबत माहिती देताना सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, हे ठग लोकांची अशा प्रकारे फसवणूक करायचे. शंभर कोटींच्या बदल्यात राज्यपाल बनवण्याचं आश्वासन ते देत असत.
फोन टॅपवरून सापडला सुगावा!
सीबीआयच्या सूत्रांनी सांगितलं की, जेव्हा या ठगांना हातात पैसा जाणार होता, तेव्हा सीबीआयनं त्यांना सापळ्यात अडकवलं आणि चौघांना अटक केली. गेल्या अनेक आठवड्यांपासून सीबीआय या चोरट्यांवर नजर ठेवून होती. फोन टॅपच्या मदतीनं सीबीआयनं या आरोपींपर्यंत पोहोचून त्यांना जागीच पकडलं. महाराष्ट्रातील लातूर येथील करमलाकर प्रेमकुमार बंडगर, कर्नाटकातील बेळगाव येथील रवींद्र विठ्ठल नाईक, दिल्ली-एनसीआर येथील महेंद्र पाल अरोरा आणि अभिषेक बुरा अशी या फसवणुकीच्या धंद्यात ओळख पटलेल्यांची नावं आहेत. सीबीआय अधिकाऱ्यांवर हल्ला करून शोध मोहिमेदरम्यान एक आरोपी पळून गेल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितलं.
कसं चालायचं रॅकेट?
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकांची फसवणूक करण्यासाठी मोठे रॅकेट चालवत असत. करमळकर प्रेमकुमार बंडगरसह अभिषेक बुरा यांनी उच्चपदस्थ सरकारी अधिकाऱ्यांच्या प्रवेशाचा हवाला देऊन कट रचला होता. या सर्वांवर एफआयआर दाखल करण्यात आली आहे. बंडगर स्वत: वरिष्ठ सीबीआय अधिकारी असल्याचं भासवायचा आणि बड्या अधिकाऱ्यांशी संबंध असल्याचं सांगायचा, असा त्याच्यावर आरोप आहे.
१०० कोटी रुपयांच्या बदल्यात राज्यसभेची उमेदवारी मिळवून देण्याचं खोटं आश्वासन देऊन आरोपी लोकांना फसवण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. टोळीकडून उच्च पदस्थ अधिकाऱ्यांच्या नावाचा चुकीच्या पद्धतीनं वापर करत लोकांची हे रॅकेट फसवणूक करत होतं, असं सीबीआयच्या तपासात उघड झालं आहे.