

मुंबई : कादंबऱ्यांपासून ते सस्पेन्स थ्रिलर वेब सीरिजपर्यंतच्या गुप्तहेर कथा वाचणं सगळ्यांनाच आवडतं. जेम्स बाँड, शेरलॉक होम्सपासून ते ब्योमकेश बक्षीपर्यंत ही पात्रं आजही आपल्या मनात जिवंत असतील. या गुप्तहेरांमध्ये आत्तापर्यंत तुम्ही फक्त पुरुषां व्यक्तिरेखेलाच पाहिलं असेल. मात्र, आम्ही तुम्हाला एक अशा महिला गुप्तहेरची माहिती सांगणार आहोत जी चित्रपटात नाही तर खऱ्या आय़ुष्यातील गुप्तहेर आहे. त्यांचं नाव रजनी पंडित असून त्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर आहेत. रजनी यांनी आपल्या गुप्तहेर कारकिर्दीत ८० हजारांहून अधिक प्रकरणं सोडवली आहेत.
कारकून म्हणून करियरची सुरुवात…
रजनी पंडित यांनी स्वतःच्या पायावर उभं राहायचं होतं. त्यासाठी त्यांनी एका कार्यालयात लिपिक म्हणून काम करण्यास सुरुवात केली. यादरम्यान त्यांच्या कार्यालयात काम करणाऱ्या महिलेच्या घरी चोरी झाली होती. महिलेला मदत करण्यासाठी रजनीनं या चोरट्याला शोधण्याची जबाबदारी घेतली. ही त्यांची पहिलीच केस होती. रजनी यांनी जेव्हा या चोरीचा तपास सुरू केला तेव्हा त्या महिलेच्याच मुलानं चोरी केल्याचं समोर आलं. रजनीनं हे प्रकरण ज्या पद्धतीनं सोडवलं त्यामुळं केवळ कार्यालयातच नाही तर कार्यालयाबाहेरही त्यांची चर्चा होऊ लागली.
वडील होते सीआयडीमध्ये…
रजनी यांचे वडील सीआयडीमध्ये होते. रजनीला हेरगिरीच्या युक्त्या तिच्या वडिलांकडूनच मिळाल्या, त्यानंतर रजनी यांनी गुप्तहेरीमध्ये आपले करिअर बनवण्याचा निर्णय घेतला. रजनीच्या वडिलांना याबद्दल काहीच माहीत नव्हते. मुलीला डिटेक्टिव्ह म्हणून करिअर करायचे आहे हे कळल्यावर त्यांनी ही नोकरी किती धोकादायक आहे हे सांगितलं. पण त्यांनी तिला थांबवलं नाही. या कामातील धोके जाणूनही तिला गुप्तहेर बनण्यासाठी पाठिंबा दिला.
वडिलांची साथ मिळाल्यावर रजनी यांचाही उत्साह वाढला. त्यांनी ‘रजनी पंडित डिटेक्टिव्ह सर्व्हिसेस’ या नावानं डिटेक्टिव्ह कंपनी सुरू केली. त्यांच्या डिटेक्टिव्ह एजन्सीमध्ये २० जणांची टीम काम करते. गुप्तहेरीसाठी रजनी यांना ६७ पुरस्कार मिळाले आहेत. त्याचबरोबर रजनी यांना राष्ट्रपती कोविंद यांच्याकडून ‘फर्स्ट लेडी डिटेक्टिव्ह’ पुरस्कारही मिळाला आहे. महिला आणि बाल विकास मंत्रालयानं त्यांना हा पुरस्कार दिला आहे.
रजनी यांच्यासाठी ‘ती’ कठीण केस…
पहिली भारतीय महिला गुप्तहेर बनलेल्या रजनी यांच्यासाठी एक केस खूप कठीण मानली जाते. शहरात बाप आणि मुलाची डबल मर्डर झाली होती. मारेकऱ्याचा सुगावा लागत नव्हता. रजनी यांना हे प्रकरण समजताच तिनं या हत्येची माहिती घेण्यासाठी मोलकरणीच्या वेशात त्या बाप-मुलाचं घर गाठलं. सहा महिने मोलकरीण म्हणून काम केल्यानंतर त्यांना खऱ्या मारेकऱ्याची माहिती मिळाली. घरात उपस्थित असलेल्या महिलेनं प्रियकरासह बाप-मुलाची हत्या केली होती.