टीव्हीवर जा आणि संपूर्ण देशाची माफी मागा..! सर्वोच्च न्यायालयानं नुपूर शर्मा यांना का फटकारलं?

WhatsApp Group

मुंबई : सत्ताधारी राजकीय पक्ष भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी एका टीव्ही डिबेट शोमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्याबद्दल काही अपमानजनक वक्तव्य केलं होतं. या वक्तव्यामुळं कानपूर, उत्तरात हिंसाचार उसळला होता. प्रदेश आणि अनेक लोक जखमी आणि ठार झाल्याचं वृत्त समोर आलं. दुसरीकडं, नुपूर शर्मा आपल्या वक्तव्यामुळं देशातील मुस्लिम संघटना आणि मुस्लिम कट्टरतावाद्यांच्या निशाण्यावर आल्या. मुस्लिम संघटनांकडून नुपूर यांना ठार मारण्याच्या आणि शिरच्छेद करण्याच्या धमक्या दिल्या गेल्या. पण तुम्हाला माहीत आहे का नूपुर शर्मा कोण आहेत आणि त्या देशातील सर्वात मोठा पक्ष भाजपमध्ये कशी सामील झाल्या?

प्राथमिक ओळख…

आपल्या वक्तव्यामुळं नुपूर शर्मा यांना प्रवक्ता पदाचा राजीनामा द्यावा लागला. राजीनामा देण्यासोबतच पक्षानं त्यांना ६ वर्षांसाठी निलंबितही केलं. हे विधान आल्यानंतर नुपूर यांनी पक्षाला पत्र लिहून स्वत:चं स्पष्टीकरण देण्याचाही प्रयत्न केला, पण त्याचा फारसा फायदा झाला नाही. नुपूर शर्मा यांचा जन्म २३ एप्रिल १९८५ रोजी नवी दिल्लीत झाला. लहानपणापासूनच हुशार आणि प्रखर स्वभावाच्या नुपूर यांनी त्यांचं प्राथमिक शिक्षण दिल्ली पब्लिक स्कूल (DPS) मधून केलं. शालेय शिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी दिल्ली विद्यापीठाच्या हिंदू कॉलेजमधून पदवीचं शिक्षण पूर्ण केलं. नूपुर यांनी अर्थशास्त्रमध्ये बॅचलर डिग्री घेतली आहे. त्यानंतर लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समधून लॉमध्ये त्यांनी मास्टर्स पूर्ण केलं.

राजकारणात पाऊल..

नुपूर यांना सुरुवातीपासूनच राजकीय क्षेत्रात रस होता. त्यांनी आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात कॉलेजपासूनच केली होती. त्यांनी कॉलेजमध्ये असताना अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (ABVP)च्या वतीनं दिल्ली विद्यापीठ विद्यार्थी संघ (DUSU) निवडणूक लढवली आणि जिंकली. यानंतर २०१० मध्ये राजकारणात असताना त्या भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चामध्ये खूप सक्रिय झाल्या. त्यानंतर २०१५मध्ये त्या भाजपमध्ये दाखल झाल्या. पक्षात प्रवेश केल्यानंतर त्यांना पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ता बनवण्यात आलं. यानंतर दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपनं नुपूर यांना अरविंद केजरीवाल यांच्या विरोधात उभं केलं, परंतु निवडणुकीच्या निकालानंतर नुपूर यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. नुपूर शर्मा या व्यवसायानं वकील असून त्या दिल्ली उच्च न्यायालयात प्रॅक्टिस करतात.

वादग्रस्त विधान…

वृत्तानुसार, देशातील प्रसिद्ध टीव्ही चॅनल टाइम्स नाऊच्या प्राइम टाइम डिबेट शोमध्ये ज्ञानवापी मशिदीच्या मुद्द्यावर वाद सुरू होता, ज्यामध्ये नुपूर शर्मा म्हणाल्या होत्या की, अनेक कट्टरवादी संघटना हिंदू धर्माची खिल्ली उडवतात. ज्यानंतर प्रेषित मोहम्मद यांच्यावरही वादग्रस्त विधान करण्यात आले आणि इस्लामिक धर्मांध श्रद्धांचा उल्लेख करण्यात आला. देशातील सामाजिक कार्यकर्ते आणि नेते मोहम्मद जुबेर यांनी नुपूर यांचा व्हिडिओ ट्विटरवर शेअर केला असून एफआयआर नोंदवून कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली. मात्र, नंतर नुपूर यांनी आपल्या वक्तव्याबद्दल माफी मागितली. तेव्हापासून नुपूर शर्मा यांना मुस्लिम कट्टरतावादी संघटनांकडून जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत.

सर्वाोच्च न्यायालयानं काय सांगितलं?

सर्वाोच्च न्यायालयानं नुपूर शर्मा यांना फटकारलं. ”नुपूर यांच्या एका वक्तव्यामुळं वातावरण बिघडलं. इतकंच नाही तर त्यांनी माफी मागण्यास उशीर केला आणि त्यांच्यामुळेच दुर्दैवी घटना घडल्या. हा सगळा वाद टीव्हीवरील चर्चेतून पसरवला जात असून त्यांनी टीव्हीवर जाऊन संपूर्ण देशाची माफी मागावी”, असं सर्वोच्च न्यायालयानं म्हटलं आहे.

सर्वोच्च न्यायालयानं या काळात दिल्ली पोलिसांच्या वृत्तीवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून त्यांच्यावर (नुपूर शर्मा) अनेक गुन्हे दाखल होऊनही अटक का करण्यात आली नाही, असं म्हटलं आहे. उदयपूरमधील कन्हैया लालच्या हत्येलाही त्यांचं वक्तव्य जबाबदार असल्याचं न्यायालयानं म्हटलं. कोणत्याही पक्षाचा प्रवक्ता असण्याचा अर्थ असा नाही की, तुमच्या बाजूनं काहीही बोलले पाहिजे, असं न्यायालयानं सांगितलं. प्रेषित मोहम्मद यांच्या विरोधात केलेल्या टिप्पणीबद्दल नुपूर शर्मा यांच्या माफीचा संदर्भ देताना न्यायालयानं सांगितलं की, खूप उशिरानं माफी मागितली आणि त्यांच्या वक्तव्यामुळं दुर्दैवी घटना घडल्या.

Leave a comment