

मुंबई : आपला भारत देश विविधता आणि अनेक सण-उत्सवांनी नटलाय. आपल्याकडं प्रत्येक राज्य, गावानुसार सण साजरे केले जातात. त्यातील वडाच्या झाडाचं महत्त्व अधोरेखित करणारा सण म्हणजे वटपौर्णिमा. वटपौर्णिमा म्हटलं की सावित्री-सत्यवान यांची कथा आलीच. याच वडाच्या झाडाखाली बसून सावित्रीनं आपल्या पतीच्या प्राणासाठी घनघोर तपश्चर्या केली. यमराजानं सावित्रीचं प्रेम पाहून तिला तिचा सत्यवान परत केला. या कथेमुळं बायका आपल्या नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी वटपौर्णिमा साजरा करतात. हिंदू कॅलेंडरनुसार वटपौर्णिमा प्रत्येक वर्षी ज्येष्ठ महिन्यात किंवा पौर्णिमेला येते.
धार्मिक मान्यतेनुसार वडाचं झाड त्रिमुर्ती म्हणजेच ब्रम्हा, विष्णू आणि शिवा या देवांचं प्रतिक आहे. बरंच आयुष्य लाभलेल्या या वडाला अक्षयवत म्हटलं जातं ते याच कारणामुळं. हे झाड आपल्या सर्व इच्छा पूर्ण करत असा समज आजही आहे.
वटपौर्णिमेला बायका काय करतात?
वटसावित्रीचं व्रत हे तीन दिवसाचं असतं, पण सर्व महिलांना ते शक्य होत नाही. या मंगल दिवशी बायका वटपौर्णिमेचं व्रत धरतात. वडाच्या झाडाखाली सत्यवान आणि सावित्री यांच्या मूर्ती वटवृक्षाखाली ठेवतात आणि त्यांची पूजा करतात. तसंच वडाभोवती कच्चा धागा गुंडाळून तीन फेऱ्या मारतात. पूजा झाली की सायंकाळच्या वेळेस सुवासिनी सावित्रीची कथा ऐकतात. शहरी भागात वडाचं झाड मिळत नसल्यामुळं घरातच वडाची फांदी आणून तिची पूजा करतात. खरं सांगायचं तर असं काही करू नये असंही सांगितलं जातं.
सावित्री-सत्यवानची स्टोरी!
मद्र देशात अश्वपती राजा राज्य करत होता. या अश्वपतीची कन्या म्हणजे सावित्री. १८ वर्षांच्या प्रयत्नानंतर अश्वपतीला सावित्री लाभली. सावित्री गुणवान, बुद्धिवान आणि सुंदर होती. आजच्या काळात अशा गुणवान मुलीला लग्नाची मागणी घालण्यास एखाद मुलगा घाबरतो, तसंच काहीसं सावित्रीच्या बाबतीत झालेलं. तिला मागणी घालण्यास कोणीही पुढं येत नव्हता. विचारात पडलेला अश्वपतीनं एक आयडिया लावली. त्यानंच सावित्रीला आपला नवरा शोधण्यास सांगितलं. मग काय स्वतंत्र विचाराच्या सावित्रीनंही वरशोधाची मोहीम हाती घेतली.
बाहुबली जसा कटप्पासोबत देशाटनाला जातो, तशीच सावित्रीही काही मंडळींना घेऊन बाहेर पडली. तिचा मोह जडला शाल्वदेशाचा राजा द्युमत्सेनचा पोरगा सत्यवानवर. द्युमत्सेनचं राज्य बर्बाद झालं होतं, शिवाय तो अंध. त्यामुळं तो सत्यवानसह जंगलात राहत होता. शांत स्वभावाच्या आणि कोणाचं कोणाला देणं-घेणं नसलेल्या सत्यवानसोबत सावित्री वनात संसार थाटायला तयार झाली. या गोष्टीत ट्विस्ट म्हणजे सत्यवानचं आयुष्य फक्त एका वर्षाचं होतं. सावित्रीही ही गोष्ट माहीत असूनही तिनं सत्यवानलाच नवरा म्हणून निवडलं.
वडिलांचं घर सोडल्यानंतर सावित्री तिच्या सासरी गेली, तिथं सासू-सासऱ्यांची सेवा करू लागली. वेळ निघून गेली. मृत्यूचा दिवस जसजसा जवळ येऊ लागला तसतशी सावित्रीची अस्वस्थता वाढू लागली. सावित्रीनं तीन दिवसांपूर्वी उपवास सुरू केला. दुसरीकडं, रोजच्या प्रमाणे सत्यवान लाकूड तोडण्यासाठी जंगलात गेला. सावित्रीही सोबत गेली. डोकं दुखत असल्यामुळं त्याला चक्कर आली आणि तो जमिनीवर आडवा पडला. सावित्रीला आता सगळं समजलं होतं. इतक्यात यमराज आला आणि तो सत्यवानाला घेऊन जायला निघाला. सावित्रीही त्याच्या मागं गेली. यमराजांनी सावित्रीला समजावून सांगितलं, की हा नियम आहे. पण सावित्री काही ऐकायला तयार नव्हती.
कंटाळलेल्या यमराजानं नवरा सोडून सावित्रीला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू-सासऱ्यांचे डोळे आणि राज्य मागितलं आणि त्यासोबत आपल्याला पुत्र व्हावं असं सांगितलं. यमराजानं तथास्तु म्हटलं खरं, पण तिसरं वचन नीट कळल्यानंतर त्याला सत्यवानला जीवदान द्यावं लागलं.