हार्दिक पंड्या उगाच फॉर्मात नाही आलाय…‘या’ मराठी माणसानं त्याला मदत केलीय!

WhatsApp Group

मुंबई : टीम इंडियाला त्यांचा जुनावाला हार्दिक पंड्या मिळाला आहे. पंड्या सध्या त्याच्या भरपूर यशदायी कमबॅकचा आनंद घेत आहे. त्यानं आपल्या कमबॅकची सुरुवात आयपीएल २०२२ पासूनच केली होती. लीगच्या माध्यमातून तो मैदानात परतला आणि त्यानं अष्टपैलू म्हणून गमावलेला दर्जा परत मिळवला. यादरम्यान, त्यानं गुजरात टायटन्सला आयपीएलच्या पदार्पणातच चॅम्पियन बनवलं. पंड्यानं या एकाच स्पर्धेतून आपल्या टीकाकारांची मुस्कटदाबी केली होती. नुकत्याच संपलेल्या आयर्लंड आणि इंग्लंडविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेनं त्यानं आपली भूक थोड्या वेळासाठी शमवली. आयर्लंड आणि इंग्लंड दौऱ्यात हार्दिक अष्टपैलू म्हणून अधिक मजबूत झाला. २०१८ पूर्वीचा हार्दिक टीम इंडियाला पुन्हा कसा मिळाला, याचा खुलासा या लेखातून होईल.

हिट हार्दिक!

इंग्लंडविरुद्धच्या तीन वनडे मालिकेत पंड्या गोलंदाजी आणि फलंदाजीत हिट ठरला. ऋषभ पंत (१२५) नंतर त्यानं या मालिकेत सर्वाधिक १०० धावा केल्या. त्याचा स्ट्राइक रेट १०१ होता. गोलंदाजीतही त्याची कामगिरी तशीच राहिली. त्यानं संपूर्ण मालिकेत १७ षटकं टाकली आणि ७४ धावांत ६ बळी घेतले. मँचेस्टरमधील तिसऱ्या आणि निर्णायक सामन्यातही त्यानं ७१ धावांची महत्त्वपूर्ण खेळी खेळली आणि २४ धावांत ४ बळी घेतले. या सामन्यात पंड्यानं ऋषभ पंतसोबत पाचव्या विकेटसाठी १३३ धावांची भागीदारी केली.

इंग्लंडविरुद्धच्या तीन टी-२० मालिकेतील दोन सामन्यांत तो मैदानात उतरला. ७ षटकांत ६२ धावांत एकूण ५ बळी त्यानं घेतले. या मालिकेत त्यानं ६३ धावाही केल्या. पंड्यासाठी इंग्लंड दौरा देखील खास होता कारण या दौऱ्यात त्यानं गोलंदाज म्हणून आपल्या टी-२० आणि एकदिवसीय कारकिर्दीतील सर्वोत्तम कामगिरी केली. मात्र, शेवटचं वर्ष त्याच्यासाठी चांगलं गेलं नाही.

टी-२० वर्ल्डकपमध्ये ठरला होता फ्लॉप!

गेल्या वर्षी टी-२० विश्वचषकात पंड्याला अष्टपैलू दर्जाप्रमाणं कामगिरी करता आली नाही. त्यानं पाच सामने खेळले. पण संपूर्ण स्पर्धेत फक्त ४ षटकं टाकली. फलंदाजीतही त्याची कामगिरी काही खास राहिली नाही आणि त्याला केवळ ६९ धावा करता आल्या. टीम इंडियाला तोटा सहन करावा लागला आणि तो ग्रुप स्टेजच्या पलीकडं प्रगती करू शकला नाही. यानंतर हार्दिकनं दीर्घ विश्रांती घेतली.

भारतीय क्रिकेट बोर्डानंही एक खेळाडू म्हणून हार्दिकचं महत्त्व जाणून असल्याचं स्पष्ट केलं. पण, आता त्याचं पुनरागमन फलंदाज म्हणून नव्हे, तर २०१८च्या पूर्वीप्रमाणेच अष्टपैलू खेळाडू झालं आहे.
हार्दिक पंड्या २०१८ पासून पाठीच्या समस्येनं त्रस्त होता. २०१८च्या इंग्लंड दौऱ्यावर ट्रेंटब्रिज कसोटी विजयात महत्त्वपूर्ण योगदान दिल्यानंतर त्यानं प्रथम याबद्दल तक्रार केली. या कसोटीत पंड्यानं ६ विकेट्स घेत नाबाद ५२ धावा केल्या. यानंतर सप्टेंबरमध्ये पाकिस्तानविरुद्धच्या आशिया चषक सामन्यात गोलंदाजी करताना याच समस्येमुळं त्याला मैदान सोडावं लागलं होते.

एका महिन्यानंतर, बंगळुरूमध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या दुसऱ्या टी-२० सामन्यादरम्यान त्याच्या पाठदुखीचा त्रास वाढला. यानंतर त्यानं शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि २०१९ मध्ये तो लंडनला गेला. अनेक महिने संघाबाहेर राहिल्यानंतर पंड्या २०२० मध्ये ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर वनडे मालिकेतून मैदानात परतला. पण, तो गोलंदाजीसाठी संघर्ष करताना दिसला. गेल्या वर्षी इंग्लंडच्या देशांतर्गत मर्यादित षटकांच्या मालिकेत खेळला, पण त्यानं गोलंदाजी केली नाही. याच कमकुवतपणाचा सामना भारताला यूएई मधील टी-२० विश्वचषक स्पर्धेत झाला.

मराठी गुरू!

इथूनच त्याचं गोलंदाज म्हणून पुनरागमन सुरू झालं. त्यानं बीसीसीआयकडून दीर्घ विश्रांतीची मागणी केली आणि अष्टपैलू खेळाडू म्हणून मैदानात परतण्यासाठी फिटनेसवर काम करण्यास सुरुवात केली. यासाठी हार्दिक मराठमोळे क्रिकेटपटू आणि गुरू किरण मोरे यांच्याकडे परतला. टी-२० विश्वचषकातील खराब कामगिरीमुळं तो मनातून तुटला होता. ही गोष्ट मोरेंना कळली होती. पंड्यानं पुन्हा स्वत:वर विश्वास ठेवायला सुरुवात केली पाहिजे, असं सांगणाऱ्या मोरेंनी प्रथम त्याच्या फलंदाजीवर काम सुरू केलं.

मोरे म्हणाले, “सुरुवातीला जेव्हा पंड्या माझ्याकडे आला. तो खरोखरच धडपडत होता. फलंदाजी करतानाही तो अस्वस्थ दिसत होता. तो मला म्हणाला, “मी माझ्या डोक्यात धावा काढण्यासाठी धडपडत आहे.” मी म्हणालो, काही हरकत नाही, काळजी करू नकोस. आपण १५ दिवसांनंतर याबद्दल बोलू. १५-२० दिवसांनंतर मला त्याच्या फटके खेळण्याच्या पद्धतीत खूप फरक दिसला.”

मोरे यांनी पंड्याच्या फलंदाजी आणि गोलंदाजीवर काम केले. त्याच वेळी, भारतीय क्रिकेट संघाचे कंडिशनिंग ट्रेनर सोहम देसाई यांनी त्याच्यासाठी संपूर्ण आरोग्य कार्यक्रम तयार केला. याबाबत मोरे म्हणाले, “पाठीची दुखापत ही छोटीशी दुखापत नाही. जेव्हा तुम्ही मैदानावर जाता तेव्हा ही गोष्ट तुमच्या मनात असते. पण, आता पंड्या पूर्णपणे तंदुरुस्त आहे आणि त्याच्या आयपीएलमधील यशानं त्याचा आत्मविश्वास अधिक वाढला आहे. हा विश्वास त्याला मैदानावर चांगली कामगिरी करण्यास मदत करत आहे. सध्या टीम इंडियाकडे त्याचा पर्याय नाही.”

Leave a comment