

मुंबई : मँचेस्टरमध्ये झालेल्या तिसऱ्या आणि शेवटच्या एकदिवसीय सामन्यात (ENG vs IND) भारतानं इंग्लंडचा पराभव करत मालिका २-१ नं जिंकली. टीम इंडियाच्या या विजयात ऋषभ पंतनं महत्त्वाची भूमिका बजावली. टीम इंडियाला विजय मिळवून देऊनच तो मैदानातून परतला. त्यानं १२५ धावांची नाबाद खेळी केली. टीम इंडियाच्या विजयाचा हिरो ठरल्यानंतर पंतला बक्षीस म्हणून शॅम्पेनची बाटली मिळाली. प्रेझेंटेशन समारंभानंतर, पंत ही बाटली घेऊन ड्रेसिंग रूममध्ये परतण्यापूर्वी मैदानात उभे असलेले टीम इंडियाचे माजी मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भेटायला गेला.
काय घडलं नक्की?
शास्त्रींनी प्रथम पंतला मिठी मारली. दोघांमध्ये थोडंसं संभाषण झालं आणि त्यानंतर शास्त्रींनी पंतच्या हातातून शॅम्पेनची बाटली घेतली. हे पाहून पंतलाही हसू आवरता आलं नाही. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे. स्टेडियममध्ये बसलेल्या प्रेक्षकांनीही या क्षणाचा पुरेपूर आनंद लुटला आणि शास्त्रींनी पंतकडून शॅम्पेनची बाटली घेताच चाहत्यांनी जोरजोरात आरडाओरडा सुरू केला. यानंतर पंत ड्रेसिंग रूममध्ये परतला.
Pant offering his champagne to Ravi Shastri#INDvENG #OldTrafford #Pant #TeamIndia pic.twitter.com/n9HguNNuID
— Tejesh R. Salian (@tejrsalian) July 17, 2022
काय म्हणाला पंत?
सामन्यानंतर जेव्हा पंतला ही खेळी आठवेल का असं विचारण्यात आलं तेव्हा तो हसला आणि म्हणाला, “आशा आहे की मला ही खेळी खूप दिवस लक्षात राहील. या खेळीदरम्यान मी प्रत्येकवेळी फक्त एका चेंडूचा विचार करत होतो. जेव्हा तुमचा संघ दडपणाखाली असतो आणि तुम्ही आता अशी फलंदाजी करता तेव्हा खूप छान वाटतं. मी नेहमीच असंच करण्याचा विचार केला आहे. मला नेहमीच इंग्लंडमध्ये खेळण्याचा आनंद मिळतो आणि मी परिस्थितीचा पुरेपूर आनंद घेतो. तुम्ही जितकं जास्त खेळाल तितका अनुभव तुम्हाला मिळेल.”
”विजयाचं श्रेय आमच्या गोलंदाजांनाही जातं. फलंदाजीसाठी विकेट चांगली होती आणि आमच्या गोलंदाजांनी इंग्लंडला कमी धावसंख्येपर्यंत रोखून चांगली कामगिरी केली. आमची गोलंदाजी केवळ तिसर्या वनडेतच नाही तर संपूर्ण मालिकेत चांगली होती”, असं पंतनं गोलंदाजांचं कौतुक करताना म्हटलं.
इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतानं ३८ धावांवर ३ विकेट गमावल्या होत्या. करा किंवा मरोच्या या सामन्यात ऋषभ पंतनं शतक झळकावलं. पंतचं हे वनडे कारकिर्दीतील पहिलं शतक आहे. त्यानं १०६ चेंडूत आपलं शतक पूर्ण केलं. यासह भारतानं या सामन्यात इंग्लंडला पाच गड्यांनी मात दिली. या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंग्लंडनं २५९ धावा केल्या होत्या. हार्दिक पंड्यानं चार बळी घेतले.