India vs Pakistan T20 World Cup : T20 विश्वचषकातील भारत–पाकिस्तान सामन्याभोवती मोठा वाद निर्माण झाला असून, पाकिस्तान क्रिकेट मंडळाने (PCB) आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेपुढे (ICC) काही महत्त्वाच्या मागण्या मांडल्या. मात्र, ICC ने यातील तीन प्रमुख मागण्या साफ फेटाळून लावल्या आहेत. यामध्ये भारत–पाकिस्तान द्विपक्षीय क्रिकेट मालिकेचा प्रस्ताव आणि भारत, पाकिस्तान व बांगलादेश यांच्यातील त्रिराष्ट्रीय मालिका यांचा समावेश होता.
15 फेब्रुवारी रोजी नियोजित असलेल्या भारत–पाकिस्तान सामन्यावर बहिष्कार टाकण्याची भूमिका पाकिस्तानने घेतल्यानंतर, रविवारी झालेली ICC आणि PCB यांच्यातील बैठक तब्बल पाच तास चालली. या बैठकीला पाकिस्तान क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष तथा देशाचे गृहमंत्री मोहसिन नक्वी आणि ICC चे उपाध्यक्ष इमरान ख्वाजा उपस्थित होते.
पंतप्रधानांशी सल्ला घेण्याची मुदत
ICC ने मोहसिन नक्वी यांना पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी सल्लामसलत करून 24 तासांत अंतिम भूमिका स्पष्ट करण्यास सांगितले आहे. भारत–पाकिस्तान सामना होणार की नाही, याबाबत अधिकृत घोषणा सोमवारी संध्याकाळी किंवा मंगळवारी सकाळी होण्याची शक्यता आहे.
बांगलादेश प्रकरणामुळे तणाव
या चर्चांमध्ये बांगलादेश क्रिकेट मंडळाचे अध्यक्ष अमिनुल इस्लाम बुलबुलही सहभागी झाले होते. भारतात खेळण्यास नकार दिल्यामुळे बांगलादेशला T20 विश्वचषकातून वगळण्याचा प्रस्ताव मांडण्यात आला होता. मात्र, त्याला विरोध करणारा पाकिस्तान हा एकमेव देश ठरला.
पाकिस्तान सरकारची भूमिका
1 फेब्रुवारी रोजी पाकिस्तान सरकारने समाजमाध्यमांवरून भारताविरुद्ध सामना खेळण्यास परवानगी नाकारल्याचे जाहीर केले. त्यानंतर पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी हा निर्णय बांगलादेशच्या समर्थनार्थ असल्याचे स्पष्ट करत ICC वर पक्षपातीपणाचा आरोप केला.
हेही वाचा – कपल्स बसतात म्हणून झाडांची कत्तल! महिलांचा अश्रूंतून संताप
ICC समोर मांडलेल्या पाच मागण्या कोणत्या?
पाकिस्तानने ICC समोर एकूण पाच मागण्या ठेवल्या होत्या.
- बांगलादेशवर कोणतीही कारवाई होऊ नये आणि त्यांना पूर्ण महसूल मिळावा
- बांगलादेशला भरपाई म्हणून जागतिक स्पर्धा देण्यात यावी
- भारत–पाकिस्तान द्विपक्षीय मालिका पुन्हा सुरू करावी
- भारत, पाकिस्तान व बांगलादेश यांची त्रिराष्ट्रीय मालिका आयोजित करावी
- भारताने यंदा बांगलादेश दौरा करावा
यापैकी भारताशी संबंधित सर्व मागण्या ICC ने आपल्या अधिकारक्षेत्राबाहेर असल्याचे सांगत फेटाळून लावल्या.
भारताचा पुढील प्लॅन काय?
भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) अद्याप अधिकृत भूमिका जाहीर केलेली नसली, तरी ICC च्या नियमांनुसार भारतीय संघ श्रीलंकेत दाखल होणार आहे. नियोजित सराव, पत्रकार परिषद आणि सामना स्थळी वेळेवर पोहोचणे – ही सर्व प्रक्रिया पूर्ण केली जाणार आहे. अंतिम निर्णय सामना पंचांकडे राहील.
सामना रद्द झाला तर किती नुकसान?
भारत–पाकिस्तान सामना हा जागतिक क्रिकेटमधील सर्वाधिक उत्पन्न देणारा सामना मानला जातो. या एकाच सामन्यातून सुमारे ₹2200 कोटींचा महसूल निर्माण होतो. सामना रद्द झाल्यास प्रसारकांना ₹200 ते ₹250 कोटींच्या जाहिरात महसुलाचा फटका बसू शकतो. केवळ 10 सेकंदांच्या जाहिरातीसाठी ₹40 लाखांपर्यंत दर आकारला जातो.
श्रीलंका क्रिकेट मंडळानेही पाकिस्तानला पत्र पाठवून सामना न झाल्यास आर्थिक नुकसान होईल आणि स्पर्धेच्या प्रतिमेला धक्का बसेल, अशी स्पष्ट चिंता व्यक्त केली आहे.
‘वाचा मराठी’चे व्हॉट्सॲप चॅनेल येथे फॉलो करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-3 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा!
‘वाचा मराठी’चा व्हॉट्सअप ग्रुप-2 जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा