

मुंबई : पहाटे चार वाजता उठून आपल्या क्रिकेट करियरला सुरुवात करणारी मिताली राज (mithali raj) स्वत:ला प्रचंड आळशी म्हणवते. थंडीच्या दिवसात आपल्या आजुबाजूचे लोक ब्लँकेट, चादर घेऊन झोपलेत आणि आपण सरावाला चाललोय, हा विचारच भयंकर आहे. पण १६ वर्षाच्या मितालीनं हा विचार केला आणि तो पुढं नेला. वडील वायुसेनेत असल्यामुळं घरात कमालीची शिस्त होती आणि हीच मेहनत मितालीला सुखकर प्रवासाअंती घेऊन आली. भारतीय महिला क्रिकेटमध्ये मिताली राज हे नाव थोरा-मोठ्यांपासून सर्वांनाच परिचित आहे. काही काळात होऊ घातलेल्या महिला आयपीएलच्या नांदीपूर्वी मितालीनं आपला क्रिकेटप्रवास थांबवला. झटपट क्रिकेटच्या काळात आपल्याला टी-२० क्रिकेट आवडत नाही, असं धाडसी मत मिताली मांडते आणि क्रिकेटच्या सर्वात ‘थोरल्या’ फॉरमॅटला आजही सलाम ठोकते. २३ वर्षाच्या करियरमध्ये फक्त १२ कसोटी सामने खेळायला मिळावेत, ही खंत मितालीला नेहमी सतावते.
हीचं लग्न होईल का?
क्रिकेटरपेक्षा मितालीला भरतनाट्यम प्रकारात करियर घडवायचं होतं. तामिळ कुटुंबातील घरात खेळाची कोणतीही पार्श्वभूमी नसताना मिताली वडिलांच्या इच्छेमुळं क्रिकेटर झाली. आजोबांना तर मितालीच्या भविष्याची भीती होती. पोरांसोबत सकाळ-संध्याकाळ क्रिकेट खेळणं, खेळामुळं अंगातोंडावर जखमा होणं मितालीच्या जीवनाचा भाग बनलं. हीचं लग्न होईल का, हा प्रश्न सर्वांच्याच मनात येत होता. पण ही पोरगी इतकी मोठी होईल, याची कल्पना कोणीही केली नसेल. आई-वडिलांनी हे सर्व विचार कधी मितालीपर्यंत पोहोचू दिले नाहीत.
23 Year Long International journey has come to an end 😭#CricketTwitter #MithaliRaj pic.twitter.com/lj6Mx98cJH
— Female Cricket (@imfemalecricket) June 8, 2022
खेळाडू म्हटलं की भूक आली, पण मिताली अजिबात फूडी नाही. फूडी हा शब्दसुद्धा तिच्यासाठी मोठा ठरेल. आयुष्यभर इडलीवर राहू शकते, जगण्यासाठी खायचं असतं, असा सोपा विचार मिताली करते. स्मृती मंधाना, हरमनप्रीत कौर यांच्यापेक्षा टेलएंडर्स म्हणजे ज्यांना तंत्रशुद्ध फलंदाजीचा गंध नसतो, अशा खेळा़डूंसोबत फलंदाजी करणं मितालीला जास्त आवडायचं. कॉन्ट्रोव्हर्सी, लावालावी यामुळं हे मत मांडणंही आजच्या जगात किती धाडसी आहे, हे तर तुम्हाला ठाऊकच असेल.
Thank you for all your love & support over the years!
I look forward to my 2nd innings with your blessing and support. pic.twitter.com/OkPUICcU4u— Mithali Raj (@M_Raj03) June 8, 2022
एक इच्छा अपूर्णच राहिली…
एकापाठोपाठ एक विक्रम मोडणाऱ्या मितालीनं तिच्या करियरमध्ये वाईट टप्पाही पाहिला. २०१८च्या टी-२० विश्वचषकानंतर मुख्य प्रशिक्षक रमेश पोवार यांच्याशी तिचे मतभेद उघड झाले. उपांत्य फेरीत तिला संघातूनही वगळण्यात आलं आणि तिनं लगेचच या फॉरमॅटचा निरोप घेतला. सलग सात अर्धशतकांचा विक्रम करणाऱ्या मितालीनं शेवटपर्यंत सातत्य राखलं. भारतीय शिबिरातील मतभेदांदरम्यान तिनं कधीही संयम गमावला नाही. तिला तिचा सुवर्ण प्रवास वर्ल्डकप हातात घेऊन संपवायचा होता, पण ही इच्छा अपूर्णच राहिली.