

मुंबई : भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू रोहित शर्मा, सूर्यकुमार यादव, रोहित शर्मा आणि ऋषभ पंत यांनी इन्स्टाग्रामवर लाइव्ह व्हिडिओ चॅट केल्याचं आपण सर्वांनी पाहिलं. यावेळी भारताचा माजी कप्तान महेंद्रसिंह धोनीही थोड्या वेळासाठी का होईना चाहत्यांना दर्शन देऊन गेला. संपूर्ण दिवसभर धोनी आणि त्याच्या या व्हिडिओ कॉलची सर्वत्र चर्चा होती. युझवेंद्र चहलनंही रोहित, सूर्यासोबत थोडा वेळ गप्पा मारल्या. आता याच संभाषणाचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय ज्यामध्ये या क्रिकेटपटूंनी एका मराठी चाहत्यांशी गप्पा मारल्या आहेत.
मराठी चाहत्यासोबत गप्पा!
या गप्पांमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती हा चर्चेचा विषय ठरला आहे. हा चाहता सूर्यकुमार यादवचा मित्र आहे. सूर्यकुमारसोबत रोहित, ऋषभ पंत दिसल्यानंतर त्यानं आपल्या घरातल्यांना व्हिडिओ कॉल दाखवला. रोहितनं ”मराठी माणूस आला वाटतं”, असं या चाहत्याबद्दल म्हटलं. त्यानंतर या चाहत्यानं मुंबईत खूप पाऊस असल्याचं सांगितलं. त्यावर सूर्यकुमारनंही त्याच्या रुमबाहेरील परिस्थिती दाखवत इथं पण पाऊस आहे, असं मराठीत म्हटलं.
या चाहत्यानं घरातल्यांना हा व्हिडिओ कॉल दाखवला. तेव्हा त्यानं घरातल्यांना खरंच कॉल केलाय, यावर विश्वास बसत नव्हता. तेव्हा सूर्यकुमार यादवनं “अरे मग दाखव ना बरोबर” असं म्हटलं. चाहता सूर्यकुमारला म्हणाला, “मी तुला ओळखतो तू बीएआरसीमधला ना? मी इथं वाशीत राहतो,” यावर सूर्यकुमारनं “जास्त लांब नाही” असं म्हटलं.
"𝘼𝙖𝙞 𝙎𝙝𝙖𝙥𝙥𝙖𝙩𝙝"
👉 When Mumbaikars meet Mumbaikars 🤭
📹: @RishabhPant17#OneFamily #DilKholKe #MumbaiIndians @ImRo45 @surya_14kumar pic.twitter.com/PJIZNWb7qV
— Mumbai Indians (@mipaltan) July 27, 2022
महाराजांची मूर्ती पाहून रोहित म्हणतो…
थोड्या वेळानंतर त्या चाहत्यानं आपल्या घरात असणाऱ्या चषकांचं दर्शन रोहित, पंत, सूर्यकुमारला घडवलं. तेव्हा तिथं छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्तीही होती. चाहत्यानं महाराजांची मूर्ती दाखवत, “छत्रपती शिवाजी महाराजांचा…” अशी हाक दिली. त्यावर रोहितनं “विजय असो” तर पंतनं “जय हिंद” असं उत्तर दिलं. रोहित कॅप्टन असलेल्या मुंबई इंडियन्सच्या ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला खूप लाईक्स मिळत आहेत. ”आई शप्पथ..जेव्हा मुंबईकर हे मुंबईकराला भेटतात”, असं कॅप्शन या व्हिडिओला देण्यात आलं आहे.
हेही वाचा – धोनी, रोहित, विराटला जे जमलं नाही ते करून दाखवणारा कॅप्टन…शिखर धवन!
टीम इंडियाला २९ जुलैपासून वेस्ट इंडिजविरुद्ध ५ सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेत भारतानं वेस्ट इंडिजला ३-० असं हरवलं. टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा आणि इतर अनेक खेळाडू टी-२० मालिका खेळण्यासाठी त्रिनिदादला पोहोचले आहेत.